Jhund: ‘झुंड’ने बॉक्स ऑफिसच्या कमाईची अपेक्षा पूर्ण केली का? नागराज म्हणतात..

| Updated on: Mar 07, 2022 | 3:44 PM

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साडेसहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Jhund: झुंडने बॉक्स ऑफिसच्या कमाईची अपेक्षा पूर्ण केली का? नागराज म्हणतात..
Nagraj Manjule and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram/ Nagraj Manjule
Follow us on

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साडेसहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. झुंडकडून बॉक्स ऑफिसवर जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली का, असा प्रश्न विचारला असता बॉक्स ऑफिसचा विचार करून मी फिल्म करत नसल्याचं नागराज यांनी स्पष्ट केलं. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते चित्रपटाविषयीच्या विविध बाबींवर व्यक्त झाले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील विविध पोस्टवरही प्रतिक्रिया दिली. “सोशल मीडियावर काळं-पांढरं करून दाखवतात, ते मला आवडत नाही”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

“बॉक्स ऑफिसचा विचार करून मी फिल्म करत नाही”

चित्रपटाच्या कमाईविषयी ते म्हणाले, “आपल्या मनात एक अपेक्षा असते की लोकांनी बघावा, कौतुक करावं. कुठल्या माणसाला हे आवडणार नाही. मला मुळात वाटतं, माझ्या मनात जी भणभण होतेय, ती लोकांना आवडावी, ती कशा स्वरुपात आवडावी याचं गणित तुम्ही नाही मांडू शकत. इतकंच व्हावं, अमूकच व्हावं, हे झालं म्हणजेच तुम्ही यशस्वी. आणि मी बॉक्स ऑफिसचा विचार करून फिल्म कधीच करत नाही. बॉक्स ऑफिसवर टिपिकल ज्या फिल्म हिट होतात, तशी फिल्म सैराटही नव्हती, ज्यानं रेकॉर्ड तोडला. त्यात कुणीच स्टार व्हॅल्यू असलेलं नव्हतं. मलाही लोकं ओळखत नव्हती. कलाकारांनाही कोणी ओळखत नव्हती. अजय-अतुल सोडलं तर आमचं कुणाचं नाव नव्हतं. पण तरी लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं. मला वाटतं, लोकांना आवडलं तर त्यांच्या पद्धतीने ते त्याला रिअॅक्ट होतात. आताही ही फिल्म आवडतेय. फेसबुकवर खूप लोकं लिहितायत. मला हे आवडतंय. काही फिल्म हळूहळू पोहोचतात, काही झटकन पोहोचतात. आपली चार पोरं असली तर त्या चारही पोरांचा ग्राफ कधी समान असत नाही. एक अपयशी आणि एक यशस्वी अशी म्हणायचीही गरज नसते.”

“सोशल मीडियावर काळं-पांढरं करून दाखवतात, ते मला आवडत नाही”

“मला तर वाटतं चित्रपटाचं खूप कौतुक होतंय. हे खरंतर आपण आपले कयास काढतो. खूप लिहितायत, जे लिहित नाहीत ते मला पर्सनली फोन करतायत, मेसेज करतायत. टोकाचा निर्णय घ्यायची आपली सवय असते. कधीकधी सोशल मीडियावर दोन मुद्दे काळे-पांढरे करून दाखवतात, तसं मला आवडत नाही. सुबोधने, जितूने लिहिलंय. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी मला पर्सनली फोन केला. कितीतरी लोकांनी लिहिलंय. हे मराठीतून कौतुक होतंय असं नाही, सगळ्यांनीच केलंय,” असं ते म्हणाले.

हेही वाचा:

Jhund: ‘साध्या माणसाची गोष्ट क्रांतीकारक कशी असू शकते?’ ‘झुंड’वर नागराज मंजुळेंचं वेगळं मत

Jhund : नागराजचा ‘झुंड’ वेग पकडतोय? बॉक्स ऑफिसवर दुपटीनं कलेक्शन, चालू आठवडा निर्णायक ठरणार