The Kashmir Filesची कथा काल्पनिक असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पल्लवी जोशी भडकल्या; म्हणाल्या..

| Updated on: Mar 22, 2022 | 9:37 AM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने काहींना इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल विचार करायला भाग पाडलं, तर काहींनी चित्रपटात दाखवलेल्या घडामोडी या काल्पनिक असल्याचा आरोप केला आहे.

The Kashmir Filesची कथा काल्पनिक असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पल्लवी जोशी भडकल्या; म्हणाल्या..
Pallavi Joshi
Image Credit source: Twitter
Follow us on

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने काहींना इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल विचार करायला भाग पाडलं, तर काहींनी चित्रपटात दाखवलेल्या घडामोडी या काल्पनिक असल्याचा आरोप केला आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी आता या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलंय. लखनऊमधील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

“आरोप करणाऱ्यांनी आधी ते 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज पहावेत”

“आम्ही जगभरात फिरलो. यूएसए, यूके, जर्मनी, सिंगापूर, जम्मू आणि काश्मीर, पुणे, थायलंड, दिल्ली जिथे जिथे आम्हाला पीडितांचं पहिलं कुटुंब सापडलं, ज्यांच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली, ज्यांच्या आईवर बलात्कार झाला, ज्या मुलांनी त्यांच्या डोळ्यांसमोर पालकांची हत्या होताना पाहिलं… आम्ही त्या लोकांना भेटलो आहोत. आम्ही त्यांच्या व्हिडिओ मुलाखती शूट केल्या आहेत आणि आमच्याकडे ते व्हिडिओ आहेत जे आम्ही लोकांसमोर आणू. त्यामुळे जर कोणी माझ्यावर चित्रपटात काहीतरी चुकीचं असल्याचा आरोप करत असेल, तर तुम्ही या आणि सर्व 4000 तासांचे ते रिसर्च व्हिडीओज पहा”, अशा शब्दांत पल्लवी जोशी यांनी उत्तर दिलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये असताना ‘द काश्मीर फाइल्स’च्या टीमने राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केलं, “द काश्मीर फाईल्स हा चित्रपट धार्मिक कट्टरता आणि दहशतवादाच्या अमानुष भयाला धैर्याने दाखवतो. हा चित्रपट समाज आणि देशाला जागृत करण्याचं काम करेल, यात शंका नाही. अशा विचार करायला लावणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन.”

विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशींविरोधात काढण्यात आला होता फतवा

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांच्याविरोधात शूटिंगच्या शेवटच्या दिवशी फतवा काढण्यात आला होता. खुद्द पल्लवी यांनी याविषयीची माहिती दिली होती. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाची दणक्यात कमाई

या चित्रपटाने आतापर्यंत 167.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच 200 कोटींचाही टप्पा पार होईल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला आहे.

हेही वाचा:

विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाला केलं होतं किस; निशा रावलचा खुलासा

The Kashmir Files: एवढाच पुळका आहे तर कमाईचे दीडशे कोटी काश्मिरी पंडितांना देणार का? विवेक अग्निहोत्रींना नवं आव्हान