‘माथ्यावर हंडा हाय पान्याचा…’ गाणं गाजलं अन् लग्नही जुळलं; वाचा, ‘या’ गीतकाराच्या आयुष्यातील किस्सा!

| Updated on: Apr 03, 2021 | 7:20 PM

गाण्यांमुळे अनेक गायक, गीतकारांना नाव, लौकीक, प्रतिष्ठा आणि पैसाही मिळाला आहे. (deepsham mangalvedhekar wrote his first song in age 18)

माथ्यावर हंडा हाय पान्याचा... गाणं गाजलं अन् लग्नही जुळलं; वाचा, या गीतकाराच्या आयुष्यातील किस्सा!
deepsham mangalvedhekar
Follow us on

मुंबई: गाण्यांमुळे अनेक गायक, गीतकारांना नाव, लौकीक, प्रतिष्ठा आणि पैसाही मिळाला आहे. पण गाणं गाजल्यानंतर लग्नच जुळलं, असं क्वचितच कुणाच्या बाबतीत घडलं असेल. प्रसिद्ध गीतकार दीपशाम मंगळवेढेकर यांच्याबाबतीत काहीसं असंच घडलं. काय आहे हा नेमका किस्सा?…. (deepsham mangalvedhekar wrote his first song in age 18)

वयाच्या 18 व्या वर्षी…

माथ्यावर हंडा हाय पान्याचा
चालली ठुमकत….

वयाच्या 18 व्या वर्षी दीपशाम मंगळवेढेकर यांनी हे गाणं लिहिलं. प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी हे गाणं गायलं. त्या काळात हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. रेडिओवर कामगारसभेत हे गाणं हमखास वाजलं जायचं. या गाण्यामुळे दीपशाम मंगळवेढेकर घराघरात पोहोचले होते. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. या गाण्याने मंगळवेढेकरांना नुसतंच नाव मिळवून दिलं नाही तर त्यांचं लग्नही जुळवून दिलं. लग्न जुळवण्यापूर्वी मंगळवेढेकरांनी त्यांच्या भावी पत्नीला आणि सासू-सासऱ्यांना हे गाणं ऐकवलं होतं. लग्न जुळवण्यासाठी माझं हे अॅडिशनल क्वॉलिफिकेशन होतं, असं मंगळवेढेकर गंमतीने सांगतात. हे गाणं ऐकून सासूरवाडीतील मंडळी जाम खूश झाली आणि लग्नाला त्यांनी होकार दिला, असं मंगळवेढेकर यांनी सांगितलं.

कलावंत वऱ्हाडी

मंगळवेढेकर यांचं लग्न जमल्यानंतर त्यांच्या लग्नाला झाडून सर्व कलावंतांनी हजेरी लावली होती. प्रसिद्ध गायक श्रावण यशवंते आणि भिकाजी भंडारे यांच्या एका हाकेवर मंगळवेढेकर यांच्या लग्नाला लोकशाहीर विठ्ठल उमप, स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, शीलादेवी, नवनीत खरे, सुमन रोहम, राजस जाधव, के.डी. शिरसाट, दिलीप सोडे आणि जयवंत दिवे आदी गायक मंडळी हजर झाली होती. एवढेच नव्हे तर मंगळवेढेकर यांच्या लग्नात या गायकांची चांगलीच मैफलही जमली होती. त्यामुळे हे आगळंवेगळं लग्न पाहून वऱ्हाडी मंडळीही खूश झाली होती.

आडनावच नाही, नावही बदललं

मंगळवेढेकर हे सोलापूरच्या मंगळवेढ्याचे. त्यांचं खरं नाव शाम खरबडे. पण गायन क्षेत्रात आल्यावर शाम खरबडेचे ते दीपशाम मंगळवेढेकर झाले. त्याचाही किस्सा आहे. प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांना मंगळवेढेकरांचं खरबडे हे आडनाव पटलं नाही. एके दिवशी त्यांनी मंगळवेढेकरांना त्यांच्या गावाचं नाव विचारलं. त्यावर मंगळवेढेकरांनी मंगळवेढा हे आपलं गाव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मग, मंगळवेढेकर हे आडनाव कसं वाटतं? असं खळे यांनी विचारलं आणि पुढे खरबडेंचे ते मंगळवेढेकर झाले. त्यांच्या आडनावाचा जसा किस्सा आहे. तसाच किस्सा त्यांच्या नावाचही आहे. त्यांचं नाव शाम होतं. सुरुवातीच्या काळात त्यांचा मित्र दिलीप यांच्यासोबत त्यांची चांगलीच जोडी जमली होती. शाम गाणं लिहायचे आणि दिलीप गायचे. त्यामुळे दिलीपमधील ‘दीप’ त्यांच्या नावापुढे आला आणि शामचा ‘दीपशाम’ झाला. अशाप्रकारे त्यांचं नाव आणि आडनावच बदलून गेलं. आणि दीपशाम मंगळवेढेकर हीच त्यांची ओळख कायम झाली. (deepsham mangalvedhekar wrote his first song in age 18)

प्रल्हाद शिंदेशी ओळख झाली अन्…

मंगळवेढेकरांचा गीत लेखनाकडे वळण्याचा किस्साही वेगळाच आहे. मंगळवेढेकर हे वडाळ्याच्या बीपीटी कॉलनीत राहायचे. तर प्रल्हाद शिंदे हे वडाळ्यात सहा नंबर गेटजवळ राहायचे. मंगळवेढेकरांची याच ठिकाणी 1972-72मध्ये प्रल्हाद शिंदेंशी ओळख झाली. कलेची आवड असल्याने ते प्रल्हाददादांबरोबर गायन पार्टीला जाऊ लागले. गायन पार्टीत पडेल ते कामही करू लागले. इथेच त्यांना लिखाणाची गोडी लागली आणि लिखाण हा त्यांचा श्वास झाला. (साभार, आंबेडकरी कलावंत) (deepsham mangalvedhekar wrote his first song in age 18)

संबंधित बातम्या:

आनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण?; हा किस्सा वाचाच!

दादा कोंडके म्हणाले, ‘तुमची गाणी मला द्या, हवं तेवढं मानधन घ्या’; मग काय झालं?, वाचा!

‘पोपटा’पासून ते ‘आंटीची वाजवली घंटी’पर्यंतची हिट लोकगीतं कुणी लिहिलीय माहित्ये का?; एकदा वाचाच!

(deepsham mangalvedhekar wrote his first song in age 18)