‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा नवा विक्रम; अभिनेत्याकडून आनंद व्यक्त

या यशाच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. तसंच प्रेक्षकांचे आभार मानले, ज्यांच्या प्रेमामुळे ही मालिका सतत नवीन शिखरे गाठत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या यशस्वी प्रवासाच्या या टप्प्याबद्दल बोलताना संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

जय जय स्वामी समर्थ मालिकेचा नवा विक्रम; अभिनेत्याकडून आनंद व्यक्त
जय जय स्वामी समर्थ मालिकेतील अभिनेता अक्षय मुदावडकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2024 | 8:30 AM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उद्धार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर इथल्या अक्कलकोटला पोहोचले, कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट इथले चोळप्पा महाराज, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि ते कसे कृतार्थ झाले, त्यांचं कसं नातं होतं आणि या भक्तिमार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या कृपाछायेखाली आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये आजवर बघायला मिळालं.

अक्कलकोट इथं स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना रोजच्या रोज अनुभवता येत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने यशाचा एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. मालिकेने 1300 भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील दिव्य कथा, त्यांच्या अलौकिक चमत्कारिक कार्यांचा प्रवास आणि त्यांच्या उपदेशांनी भरलेले अनेक प्रसंग यामुळे ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली आहे.

याविषयी बोलताना ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील स्वामी अर्थात अक्षय मुडावदकर म्हणाले, “आज जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे 1300 भाग पूर्ण होत आहेत. सर्व प्रथम या मालिकेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. कारण 4 वर्षांचा 1300 भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण झाला आहे. एक टीम म्हणून प्रत्येकाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे कारण हे कोणा एकट्यामुळे शक्य नाही. हे यश संपूर्ण टीमचे आहे. टीमसोबत मी रसिक प्रेक्षकवर्गाचे आभार मानतो, कारण त्यांनी मालिकेच्या पहिल्या भागापासून मालिकेवर, कलाकारांवर आणि कलर्स मराठीवर भरपूर प्रेम केलं. ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात येईलच असं नाही. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”