आमिर खानपासून दुरावला मुलगा; मोठा निर्णय घेत म्हणाला “ती चूक महागात पडली..”
आमिर खानचा मुलगा जुनैद खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांबद्दलचा एक मोठा खुलासा केला आहे. ती एक चूक महागात पडल्याचं सांगत त्याने यापुढे वडिलांसोबत मोजकंच काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आणि त्याची पहिली पूर्व पत्नी रीना दत्ता यांचा मुलगा जुनैदने वडिलांप्रमाणेच अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. जुनैद खानने ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटातील त्याच्या अभिनयकौशल्याचं खूप कौतुकसुद्धा झालं होतं. परंतु त्यानंतर जुनैदचे चित्रपट प्रेक्षकांना फारसे रुचले नाहीत. आता याच गोष्टीवरून जुनैदने एक खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की तो आता त्याच्या वडिलांना म्हणजेच आमिर खानला त्याच्या चित्रपटांची स्क्रिप्ट ऐकवत नाही. यामागचं कारणसुद्धा त्याने या मुलाखतीत सांगितलं आहे. जुनैदला विचारण्यात आलं की तो त्याचे फिल्म प्रोजेक्ट्सची चर्चा आमिरसोबत करतो का? त्यावर उत्तर देताना तो लगेच म्हणाला, “नाही, कारण मी ‘एक दिन’ या चित्रपटाच्या वेळी अशीच चूक केली होती.”
विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने सांगितलं की, दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी ‘महाराज’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होण्यापूर्वीच थाई चित्रपट ‘वन डे’च्या रीमेकचे हक्क विकत घेण्याबद्दल कल्पना दिली होती. त्या कथेवर ते चित्रपट बनवू इच्छित होते. त्यावेळी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू होतं. नंतर ‘महाराज’च्या शूटिंगदरम्यानच सिद्धार्थने जुनैदला ‘एक दिन’ची संपूर्ण कथा ऐकवली होती. तेव्हा जुनैदला स्क्रिप्ट खूप आवडली होती आणि त्याने लगेच चित्रपटाला होकार दिला होता. परंतु त्यावेळी सिद्धार्थ ‘महाराज’ या चित्रपटावर काम करत होते, म्हणून ते स्वत: या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेऊ शकले नव्हते.
या घडामोडींनंतर जुनैदने चित्रपटाची स्क्रिप्ट आमिर खानला दाखवली आणि त्याचा सल्ला घेण्याचा विचार केला. पण चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर आमिर इतका भावूक झाला की त्याने लगेच चित्रपटाची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर जुनैद म्हणाला, “बाबा उत्तम निर्माते आहेत, परंतु त्यांच्यासोबत काम करण्याची समस्या अशी आहे की त्यांना चित्रपट बनवण्यासाठी पाच वर्षे लागतात. तेव्हा मला समजलं की जर मी एखादी स्क्रिप्ट वडिलांकडे घेऊन गेलो आणि त्यांनी तो स्वत: निर्मित करण्याची इच्छा व्यक्त केली तर पाच वर्षांत एकच चित्रपट बनू शकेल. त्यांच्यासाठी ही गोष्ट ठीक आहे, पण मी आता कुठे माझं करिअर सुरू करतोय.”
यावेळी जुनैद मस्करीत असंही म्हणाला की, त्याला वडिलांसोबत चित्रपटावर काम करायचं आहे, पण सध्या तो काही काळ प्रतीक्षा करणंच पसंत करेल. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसल्या की आमिर लगेच अस्वस्थ होतो, असाही खुलासा त्याने यावेळी केला. सुनील पांडे दिग्दर्शित ‘एक दिन’ या चित्रपटात जुनैदसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली. परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणक्यात आपटला. जुनैदच्या ‘लवयापा’ या चित्रपटाच्या वेळीही असंच काहीसं घडलं होतं.