जानकी-ऋषिकेशच्या नात्यात मकरंद नावाचं वादळ; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये धमाकेदार एण्ट्री

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. जानकी आणि ऋषिकेशच्या नात्यात मकरंद नावाचं वादळ येणार आहे. मकरंदची भूमिका प्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे. हा अभिनेता कोण आहे, ते जाणून घ्या..

जानकी-ऋषिकेशच्या नात्यात मकरंद नावाचं वादळ; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये धमाकेदार एण्ट्री
gharoghari matichya chuli
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2025 | 1:59 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेची गोष्ट 12 वर्ष मागे गेली असून ऋषिकेश जानकीच्या प्रेमाची गोष्ट आणि त्यांच्या प्रेमात अडथळे आणू पहाणारा मकरंद असा रंजक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. मनोमनी जानकीला तो आपली पत्नी मानतो. सहसा तो कुणाला दुखावत नाही मात्र त्याला कुणी दुखावलंच तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. संकोची वृत्तीचा असलेला मकरंद जानकी-ऋषिकेशच्या नात्यातला सर्वात मोठा अडथळा असणार आहे. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा प्रत्येक भाग म्हणजे नवा खुलासा करणारा ठरणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर मकरंद ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना कश्यप म्हणाला, “स्टार प्रवाहसोबत माझं खूप जुनं नातं आहे. अगदी ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मकरंद ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. अतिशय हुशार आणि स्वकतृत्वावर विश्वास असणाऱ्या मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. जानकीचं प्रेम मिळवण्यासाठी तो काय काय करतो हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

“मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. सगळ्यांनीच मला या परिवारात सामील करुन घेतलं. मराठी टेलिमव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घरोघरी मातीच्या चुली मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे,” अशा शब्दांत त्याने अनुभव सांगितला. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

आजवर आपण मालिकेच्या कथानकात आलेले लीप पाहिले आहेत. पण मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घरोघरी मातीच्या चुली मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे गेलं आहे. जानकी-ऋषिकेशच्या संसाराची गोष्ट आपण मालिकेच्या पहिल्या भागापासून पहात आलोय. पण जानकी-ऋषिकेशची भेट नेमकी कशी झाली? पहिली भेट ते लग्न हा प्रवास नेमका कसा होता? या प्रवासात नेमका कसा चढ-उतार होता? याची रंजक गोष्ट मालिकेतून पाहायला मिळत आहे.

Follow Us