भारताने माझी फसवणूक केली..; देश सोडून इराणला निघाली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं काय घडलं?

इराणबद्दल बोलल्याने आणि काही निदर्शनांमध्ये भाग घेतल्याने मुंबईत बरेच मित्र-मैत्रिणी गमावल्याचं या अभिनेत्रीने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर पुन्हा इराणला जाण्याची तयारी केल्याचंही ती म्हणाली आहे.

भारताने माझी फसवणूक केली..; देश सोडून इराणला निघाली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं काय घडलं?
Mandana Karimi
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 10:30 AM

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्री मंदाना करिमीने आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता तिने असं काही वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंदानाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारत सोडून तिच्या मायदेशीर इराणला जाण्याचं वक्तव्य केलं आहे. ‘भाग जॉनी’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मंदाना करिमीने ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि इराणबद्दल मोकळेपणे भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत मंदाना म्हणाली, “सुरक्षेच्या कारणास्तव मी भारत सोडतेय. माझ्यासाठी हे अत्यंत कठीण आहे. फार कमी वयात मी इथे आली होती आणि आता इथून जाण्याची तयारी करत आहे. भारताने माझी फसवणूक केली आणि गेल्या दोन महिन्यांपासून मला फार एकटं वाटू लागलं आहे. यामागचं कारण म्हणजे मी इराणबद्दल मोकळेपणे बोलले. यामुळे मी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना गमावलं आहे. ते माझ्यापासून दुरावले गेले आहेत. अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात या देशाने मला बऱ्याच संधी दिल्या आहेत. त्यासाठी मी या देशाची कायम आभारी असेन.”

“खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये दुसऱ्यांना सत्तेत आणण्याचा निर्णय घेतला जात आहे. मी बऱ्याच काळापासून स्वतंत्र इराणचं स्वप्न पाहत आले आहे. जिथे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळू शकेल आणि ते कॉलेजमध्ये शिकू शकतील, त्यांच्या आवडीचे कपडे परिधान करू शकतील. हे जसं शक्य होईल, तसं मी इराणला परत जाईन. मी बॅग भरले आहेत आणि सर्व तयारी झाली आहे. आता आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. कारण इतक्या वर्षांपासून आम्ही जगाला मदत करण्याची विनंती करत आहोत. ही इराणी राजवण मध्य पूर्वेतील कर्करोगासारखी आहे. आम्ही 48 वर्षांहून अधिक काळापासून लढत आहोत”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

भारतीय सिनेसृष्टीत मंदानाला खरी ओळख सलमान खानच्या लोकप्रिय ‘बिग बॉस’ या शोमुळे मिळाली. बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिला काही बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्स मिळाले.

Follow Us