मला अमिताभ बच्चन यांची दया येते, प्रतिमा जपण्यासाठी ते..; हे काय बोलून गेल्या मौसमी चॅटर्जी?

अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या स्टारडमबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. या दोघांमध्ये काय फरक आहे, हेसुद्धा त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी एक म्हणसुद्धा वापरली.

मला अमिताभ बच्चन यांची दया येते, प्रतिमा जपण्यासाठी ते..; हे काय बोलून गेल्या मौसमी चॅटर्जी?
Moushumi Chatterjee and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2025 | 11:15 AM

जेव्हा कधी स्टारडम आणि पॉवरची चर्चा होते, तेव्हा राजेश खन्ना यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. राजेश खन्ना यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी काय-काय केलंय, याचे अनेक किस्से ऐकायला आणि वाचायला मिळतात. काहींनी त्यांना अक्षरश: रक्ताने पत्रं लिहिली होती, तर काहींनी त्यांच्या फोटोशी लग्न केलं होतं. इतकंच नव्हे तर राजेश खन्ना यांच्या गाडीच्या चाकाखालील धुळीसाठीही लोक भांडायचे. महिला ती धूळ त्यांच्या भांगेत भरून राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्याचं मानायचे. अशी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याच स्टारने अनुभवली नसावी. परंतु राजेश खन्ना यांचा स्टारडम जितका मोठा होता, तितकाच त्यांचा पडता काळही त्रासदायक होता. या सर्वांत एक कलाकार असाही होता, जो यश मिळवल्यानंतरही खूप विनम्र होता. हा कलाकार म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन.

‘फिल्मफेअर’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी अमिताभ बच्चन यांचं तोंडभरून कौतुक केलं. मोठ्या स्टारच्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी ते त्यांचे शब्द अत्यंत जपून वापरायचे आणि संपूर्ण वेळ अत्यंत विनम्रतेने वागायचे, असं त्या म्हणाल्या. “अमिताभ बच्चन हे खूप हुशार आहेत. ते नेहमी राजकीयदृष्ट्या योग्य असे शब्द वापरतात. मला कधीकधी त्यांची दया येते, बहुतांश वेळी ते फक्त परफॉर्मच करत असतात. कारण त्यांना फक्त तेवढंच माहीत आहे. मी कदाचित चुकीची असेन पण मला त्यांच्याविषयी असंच वाटतं. हे त्यांच्या प्रतिमेमुळे आहे. त्यांची प्रतिमा इतकी मोठी आहे, जे इतर कोणीही साध्य करू शकलं नाही”, असं त्या पुढे म्हणाल्या.

अमिताभ बच्चन हे राजेश खन्ना यांच्यापेक्षा किती वेगळे आहेत याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, “प्रचंड यशानंतरही स्थिर राहण्यात अमिताभ यशस्वी झाले आहेत. राजेश खन्ना याच गोष्टीत अपयशी ठरले. त्यांच्या यशाने ते प्रचंड भारावले होते. एक म्हण आहे.. एक अनपढ गुंडा और एक पढे लिखे गुंडे में बहुत फर्क होता है (सुशिक्षित आणि अशिक्षित गुंडामध्ये नेहमीच फरक असतो.) मी कधीही अमिताभ बच्चन यांना चापलूसी करणाऱ्यांसोबत पाहिलं नाही. परंतु राजेश खन्ना नेहमीच अशा लोकांच्या वेढ्यात असायचे. त्यांना त्या लाडाची आणि लक्षाची गरज होती.”

“हे सर्व त्यांच्या डोक्यात कसं गेलं आणि त्यांचा मोठा पडता काळ कसा आला हे पाहणं दु:खद होतं. त्यांच्यासाठी हे खूप भयानक घडलं होतं. एकेकाळी ते सर्वांत मोठे स्टार होते, त्यांच्याइतकं यश कोणीही अनुभवलं किंवा पाहिलं नसेल”, अशा शब्दांत त्या राजेश खन्ना यांच्या पडत्या काळाविषयी व्यक्त झाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us