
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात दहशदवाद्यांनी 26 पर्यटकांचा बळी घेतला. 22 एप्रिल रोजी पहलगाम याठिकाणी घडलेल्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं. तर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. आता अभिनेते सुनिल शेट्टी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या सुनिल शेट्टी यांचं वक्तव्य तुफान चर्चेत आहे.
सुनील शेट्टी यांनी त्यांच्या विधानाद्वारे सामान्य लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांना या दहशतवाद्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काश्मीरला भीतीची नाही तर प्रेम आणि पर्यटनाची गरज आहे… असं देखील सुनिल शेट्टी म्हणाले आहेत. मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी यांनी देशवासियांना त्यांच्या येणाऱ्या सुट्ट्या काश्मीरमध्ये घालवण्याचे आवाहन केले.
सुनिल शेट्टी म्हणाले, ‘एक नागरिक म्हणून आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे. आपल्याला एक गोष्ट ठरवायची आहे आणि ती म्हणजे आपली पुढील सुट्टी काश्मीरमध्येच होईल. आपल्याला दहशदवाद्यांना दाखवायचं आहे की, भारतीय घाबरलेले नाहीत.’ या घटनेनंतर, काश्मीरमधील लोक पर्यटनातील घसरणीबद्दल चिंतेत आहेत. तर सुनील शेट्टी यांनी आपला मुद्दा ठामपणे मांडला.
सुनिल शेट्टी यांनी स्वतः काश्मीर येथील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. ‘जर तुम्हाला वाटत असेल की आपण तिथे पर्यटक म्हणून किंवा कलाकार म्हणून शूटिंगसाठी किंवा फिरण्यासाठी देण्यासाठी यावं, तर आम्ही तयार आहोत. या वेळी आपल्याला एकजूट राहावे लागेल. भीती आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या जाळ्यात न अडकता, आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल की काश्मीर आपला होता, आपला आहे आणि नेहमीच आपला राहील.’ सध्या सुनिल शेट्टी यांचं वक्तव्य चर्चेत आहे.