
‘बिग बॉस 14’मध्ये अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांना भेटले. शोमध्ये असताना दोघांमध्ये खूप भांडणं झाली, पण नंतर हळूहळू हे भांडण प्रेमात बदललं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रिलेशनशिपच्या दोन वर्षांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पवित्रा एजाजसोबतच्या नात्याविषयी आणि ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत पवित्राने एजालला ‘आत्ममग्न’ असल्याचं म्हटलंय. तो फक्त स्वत:चाच विचार करतो आणि त्याच्या पार्टनरने त्याच्या म्हणण्यानुसारच वागावं, अशी त्याची इच्छा असल्याचं पवित्राने सांगितलं.
“जर एखादा पुरुष तुमच्यावर दबाव आणत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही जाऊ द्या. आज मी हे बऱ्याच महिलांना सांगते. एखादी स्त्री समर्पितपणे वागत असेल तर ती चांगली असते, यात काही शंका नाही. स्त्री ही नाजूक आणि निर्मळ असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जेव्हा ती तुमच्या समोर बसते, तेव्हा तुम्ही तिला प्रश्न विचारला पाहिजे. जर एखादा पुरुष सतत तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आत्ममग्न असतो. हे आमच्यासोबतही घडलंय. आम्ही आमचं नातं सुरुवातीला खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ते जमलंच नाही. या नात्यात पुरुषत्व आणि स्त्रीत्वाचा संघर्ष खूप होता”, असं पवित्रा म्हणाली.
एजाजकडून धर्मांतराचा दबाव होत असल्याने पवित्राने ब्रेकअप केल्याची जोरदार चर्चा होती. त्यावरही तिने स्पष्टीकरण दिलं आहे. “नाही, माझ्या कुटुंबीयांनी माझी खूप साथ दिली. या इंडस्ट्रीत जात-पात, धर्म यांना कोणतीच जागा नसल्याचं त्यांना माहीत आहे. मी एजाजला आधीच स्पष्ट केलं होतं की मी माझा धर्म बदलणार नाही. जर एखादी व्यक्ती त्याच्या धर्माशी प्रामाणिक राहत नसेल तर ती तुमच्याशी कशी प्रामाणिक राहील?”, असं ती पुढे म्हणाली. पवित्रासोबतच्या ब्रेकअपबद्दल अद्याप एजाजने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.