सुशांतच्या आठवणीत अंकिताची भावूक पोस्ट; ‘पवित्र रिश्ता’ मालिकेविषयी लिहिलं..

'पवित्र रिश्ता' या मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेनं इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याचसोबत तिने सुशांतसोबतचे मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

सुशांतच्या आठवणीत अंकिताची भावूक पोस्ट; पवित्र रिश्ता मालिकेविषयी लिहिलं..
Ankita Lokhande and Sushant Singh Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 02, 2024 | 10:15 AM

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेमुळे अनेक कलाकारांचं आयुष्य बदललं. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आजही ही जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेत एकत्र काम करता करता अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंकिताने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. मालिकेतील सुशांतसोबतचे काही फोटोसुद्धा तिने पोस्ट केले आहेत.

अंकिताची पोस्ट-

‘ही 15 वर्षे फक्त अर्चनाची नाहीत, तर ही 15 वर्षे अर्चना आणि मानव या दोघांची आहेत. प्रेम, विवाह, समजूतदारपणा आणि सहवास दर्शविणारं हे जोडपं. ते परफेक्ट होते. त्यांच्याकडे पाहून आपण नातं असं असावं असं म्हणतो. परिपूर्ण विवाह म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं. मला खात्री आहे की अर्चना आणि मानव यांच्यासारखी खरी, गोड आणि अप्रतिम ऑनस्क्रीन जोडी आजवर बनलीच नाही. या सर्वांचं श्रेय प्रेक्षकांना जातं, ज्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. अर्थातच एकता मॅडम यांनी आमच्यावर केलेल्या विश्वासामुळेच आम्ही स्क्रीनवर ती जादू निर्माण करू शकलो’, असं तिने लिहिलं.

‘मानवमुळे अर्चना पूर्ण झाली. अर्चनाचा उल्लेख जेव्हा जेव्हा होईल, तेव्हा मानवची आठवण काढली जाईल. कारण त्यांचा ‘पवित्र रिश्ता’ हा तुम्हा सर्वांसोबत असलेल्या माझ्या ‘पवित्र रिश्ता’इतकाच शुद्ध होता. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आज मी जशी आहे, तशी बनली नसते. मानवशिवाय अर्चनाचं अस्तित्वच नाही. हे जितकं माझं सेलिब्रेशन आहे, तितकंच त्याचंही आहे. तू जे काही साध्य केलंस आणि अभिनयात तू जे यश संपादित केलंस, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे’, अशा शब्दांत अंकिताने भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टच्या अखेरीस तिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या शीर्षकगीताच्या काही ओळी लिहिल्या आहेत.

या मालिकेनंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो चे’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. तर अंकितानेही ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.