महायुतीत मिठाचा खडा? परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला भाजप नेते गैरहजर, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mahayuti Tension : ठाण्यात महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात भाजपच्या बड्या नेत्यांसह अनेक स्थानिक नेत्यांनीही गैरहजेरी लावल्याचे पहायला मिळालं.

गिरीश गायकवाड, मयुरेश जाधव, प्रतिनिधी : ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांची नावे असतानाही त्यापैकी एकही नेता कार्यक्रमाला उपस्थित राहिला नसल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ठाण्यात परिवहन विभागाचा कार्यक्रम
समोर आलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. या अभियानांतर्गत अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मराठी भाषेचा वापर आणि रिक्षाचालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा सांगता समारंभ होता.
भाजपचे नेते गैरहजर
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र हे दोघेही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. तसेच भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि आमदार माधवी नाईक यांची नावे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत होती. मात्र, हे तिन्ही आमदारही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक पातळीवर मतभेद
महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना हे प्रमुख घटक पक्ष आहेत. राज्यात दोन्ही पक्षांकडून एकत्रितपणे सरकार चालवले जात असले तरी स्थानिक पातळीवर विविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या आहेत. ठाण्यातील या कार्यक्रमातील भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे अशाच चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
दरम्यान, नेत्यांच्या गैरहजेरीमागे नेमके राजकीय कारण आहे की इतर काही कारणांमुळे त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही भाजपच्या स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती महायुतीतील कथित मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आणणारी ठरते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उदय सामंत यांचा भाजप नेत्यांना टोला
ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेते अनुपस्थित होते. यावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, ठाण्यातील स्थानिक लोकप्रतिनीधी येथे उपस्थित नव्हते. एकनाथ शिंदे येथे उपस्थितीत होते, परिवहन खात्याचे सरनाईक उपस्थितीत होते. त्यांनी धाडस केलं म्हणून मीही धाडस केलेलं आहे. मराठी भाषेबद्दल आत्मीयता आहे ते इकडे उपस्थित होते.
