अमृता-प्रसादने सांगितलं लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यामागचं खरं कारण

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांच्या प्रेमात पडले. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नापूर्वी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यामागचं खरं कारण अमृताने सांगितलं आहे.

अमृता-प्रसादने सांगितलं लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यामागचं खरं कारण
Prasad Jawade and Amruta Deshmukh
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 14, 2023 | 6:39 PM

मुंबई : 14 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृता लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. अमृता आणि प्रसादचे पालक हे दोघांचं नातं दीर्घकाळ टिकण्याबाबत साशंक होते, म्हणूनच दोघांनी आधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

अमृता म्हणाली, “आमचे पालक दोघांना प्रश्न विचारत होते की तुम्हाला या नात्याबद्दल खात्री आहे का? त्यावर आम्ही त्यांना सकारात्मकतेने बोलत होतो की होय आम्हाला खात्री आहे. पण कुठेतरी आम्हालाही ही गोष्ट माहीत होती की आमच्या नात्यात अशा काही गोष्टी आहेत, असे काही प्रश्न आहेत जे सोडवण गरजेचं होतं. त्यामुळे एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे ओळखण्यासाठी आम्ही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.”

“आमच्या पालकांना या नात्यावर विश्वास होता. लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल लोक काय विचार करतात माहीत नाही, पण आमच्याबाबत ते खूप कामी आलं. लग्नानंतर आम्हाला एकमेकांविषयी बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी आणि सवयी कळतील. पण त्याआधीच लिव्ह इनमध्ये राहिल्याने आम्हाला आमचा स्वभाव आणि सवयी खूप चांगल्याप्रकारे माहीत झाल्या आहेत”, असं प्रसादने सांगितलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर 22 जुलै रोजी दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी प्रसाद आणि अमृताने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते.

बिग बॉसच्या घरात अमृता आणि प्रसाद एकमेकांविरुद्ध खेळले. पण याच खेळीदरम्यान दोघांमध्ये प्रेमाची कळी उमलली. लग्नापूर्वी एकत्र राहिल्याने दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी कळल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने त्यांच्या पहिल्या भांडणाचाही किस्सा सांगितला होता. “प्रसादच्या मोबाइलचा अलार्म सतत वाजत होता. त्याने सलग 10-12 अलार्म लावले होते. ते अलार्म मोठमोठ्याने वाजत असतानाही तो मस्त झोपला होता. त्याला तो बंद करायला सांगितला, तरीही काही फरक पडला नाही. याची झोप इतकी गाढ आहे हे मला तेव्हा समजलं. त्याला अजिबात जाग येत नाही. मलाच उठून तो अलार्म बंद करावा लागतो”, असं तिने सांगितलं होतं.