तिसरं लग्न केलेल्या आमिरला प्रिती झिंटाने केलं दुर्लक्ष? व्हिडीओ पाहून थेट म्हणाली..
अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेता आमिर खानकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. याच व्हिडीओवर आता प्रितीने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा जवळपास आठ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतेय. ‘बंटवारा 1947’ या चित्रपटात ती अभिनेता सनी देओलसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी देओल आणि प्रिती झिंटा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पापाराझींनी दावा केला आहे की प्रितीने या कार्यक्रमात आमिर खानला दुर्लक्ष केलं. हाच व्हिडीओ अखेर प्रितीपर्यंतही पोहोचला आणि त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
एका पापाराझी पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये प्रिती झिंटा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना दिसत आहे. व्हॅनबाहेर फोटोग्राफर्सची गर्दी पाहून ती जरा गोंधळते आणि संभ्रमात पडते. “एक मिनिट गाइज, कुठे जायचं आहे”, असा प्रश्न ती विचारते. त्यानंतर फोटोग्राफर्स तिला रस्ता दाखवतात, पण प्रिती मात्र दुसऱ्याच दिशेने चालत जाते. यावेळी आमिरसुद्धा त्याच्या व्हॅनिली व्हॅनबाहेर उभा असतो. परंतु प्रिती त्याच्याकडे बघतही नाही, ती थेट पुढे निघून जाते. ‘ओह नो.. प्रिती झिंटाने आमिर खानला दुर्लक्ष केलं का’, असं कॅप्शन देत पापाराझींनी हा व्हिडीओ पोस्ट केला. याच व्हिडीओवर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रिती झिंटाचं उत्तर-
प्रितीने या व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिलं, ‘अशा पद्धतीचं क्लिकबेट कंटेंट ठीक नाही. मी आमिरला पाहिलंसुद्धा नव्हतं, कारण मी खूप घाईत होते. मला आज जाऊन काही शॉट्स शूट करायचे होते आणि ‘बंटवारा 1947’च्या प्रमोशनसाठी मला लांब विमानाने प्रवास करायचं होतं. पुढच्या वेळी जर तुमचा हेतू कोणत्याही प्रकारची नकारात्मकता पसरवायची असेल, तर कृपया मला थांबवून माझे फोटो क्लिक करण्याची अपेक्षा ठेवू नका. माझ्या मनात आमिरविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत.’
प्रिती झिंटाच्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे. यात सनी देओल, शबाना आझमी, अली फजल, करण देओल, अभिमन्यू सिंग, कनिका कपूर आणि खुशी हजारे यांच्याही भूमिका आहेत. येत्या 14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.