मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद

'थलायवा' रजनीकांत यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर बोलण्याची भीती आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे. हल्ली मी बोललो किंवा गप्प राहिलो तरी लोक टीका करण्यासाठी निमित्तच शोधत असतात, असं ते म्हणाले.

मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद
Rajinikanth
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2026 | 10:59 AM

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘धर्मन’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. या चित्रपटाची निर्मिती कमल हासन करत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनिमित्त आयोजित कार्यक्रमात रजनीकांत यांच्यासोबत कमल हासन आणि दिग्दर्शक अश्वथ मारिमुथुसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात रजनीकांत असंकाही म्हणाले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मी आता माध्यमांसमोर काहीही मोकळेपणे बोलण्यास कचरतो, असं ते स्पष्ट म्हणाले. इतकंच नव्हे तर, मी काहीही बोललो किंवा गप्प राहिलो तरी मला टीकेला सामोरं जावं लागतं, अशा शब्दांत रजनीकांत व्यक्त झाले. याआधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना शुभेच्छा न दिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.

‘धर्मन’च्या या कार्यक्रमात रजनीकांत यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं, “आजकाल मी सार्वजनिक व्यासपीठावर काहीही बोललो, तरी त्यामुळे वाद निर्माण होणं अटळ आहे. त्यामुळे मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे, असं कोणी सांगितलं की मी संकोचतो. कारण मी काहीही बोललो तरी त्याने एकतर माझी किंवा तुमची अडचण होते. बरं मी शांत राहिलो तरी काही लोक माझी चेष्टा करतात आणि विचारतात, हे काहीच का बोलत नाहीयेत? त्यांनी तोंडात कोझुकट्टाई (मिठाई) ठेवली आहे का? मी काही केलं तरी लोक माझ्यावर टीका करण्यासाठी कारणं शोधून काढतातच.”

“मी बोललो तरी काही लोक म्हणतील की, आता बोलायची काय गरज होती? तर काही लोक असाही टोमणा मारतील की, त्यांनी अजिबातच बोलायला नको होतं. त्यामुळे इतक्या वर्षांत मी एक गोष्ट शिकलोय की, जे लोक तुम्हाला पसंत करत नाहीत, ते तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला पसंत करणार नाहीत. जे लोक तुम्हाला पसंत करतात, त्यांना तुम्ही केलेलं प्रत्येक काम आवडेलच असा विचार करणं मूर्खपणाचं आहे. म्हणूनच खूप सावधगिरी बाळगावी लागते”, असं ते पुढे म्हणाले.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांना मिळालेल्या मोठ्या यशानंतर रजनीकांत या निकालावर नाराज असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या होत्या. या अफवांना शांत करण्यासाठी रजनीकांत यांनी चेन्नईतल्या त्यांच्या घरी एक पत्रकार परिषद घेतली होती. “मीडिया जेव्हा अचानक मला विजय यांच्याबद्दल विचारू लागली, तेव्हा मी हैराण झालो होतो. मी त्यांच्यासाठी खुश आहे. मला त्यांच्याविषयी ईर्षा किंवा मत्सर का वाटेल? आमच्या वयात 25 वर्षांचं अंतर आहे”, असं ते म्हणाले होते. मात्र यानंतर हा वाद मिटण्याऐवजी रजनीकांत यांच्या वक्तव्यामुळे चर्चा अधिकच वाढली.

Follow Us