मलाही तुमच्या इतकेच मृतदेह आवडतात, ‘तिसरी लाट’ चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या, दिग्दर्शकाचा पंतप्रधान मोदींना उपरोधिक टोला

| Updated on: May 02, 2021 | 9:53 PM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत सध्याच्या कोरोना परिस्थितीवर उपरोधिक टोला लगावला आहे (Ram Gopal Varma slams PM Narendra Modi).

मलाही तुमच्या इतकेच मृतदेह आवडतात, तिसरी लाट चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या, दिग्दर्शकाचा पंतप्रधान मोदींना उपरोधिक टोला
दिग्दर्शकाचा पंतप्रधान मोदींना उपरोधिक टोला
Follow us on

मुंबई : देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतोय. नव्या कोरोना रुग्णांसह मृत्यूचं प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. देशभरात सध्या दिवसाला तीन ते साडेतीन हजार रुग्णांचा मृत्यू होतोय. अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचा सरकारविरोधात रोष वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे देखील अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर राजकारण्यांवर उपरोधिकपणे टीका करत संताप व्यक्त केला आहे. राम वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत सध्याच्या कोरोना परिस्थितीवरुन उपरोधिक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही उपरोधिक टीका केली आहे (Ram Gopal Varma slams PM Narendra Modi).

राम गोपाल वर्मा नेमकं काय म्हणाले?

“सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण मला तुमच्या आगामी ‘तिसरी लाट’ या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या, अशी माझी विनंती आहे. मी मृतदेह मोजण्याच्या विभागात काम करु शकतो. कारण मलाही तुमच्या इतकेच मृतदेह आवडतात. पण त्याला कारणं वेगवेगळी आहेत”, असं राम गोपाल वर्मा ट्विटरवर म्हणाले आहेत (Ram Gopal Varma slams PM Narendra Modi).

सोनिया गांधींनाही टोला

“नरेंद्र मोदी मौत का सौदागर आहे, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 2014 मध्ये म्हणाल्या होत्या. त्यांची इतकी दूरदृष्टी होती हे मला कधीच माहिती नव्हतं. मॅडम मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. शक्य असेल तर तुमचे पाय मेसेज करा. मी डिजीटली त्यांना नमस्कार करेन”, असं देखील राम गोपाल वर्मा उपरोधिकपणे म्हणाले.

महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा भयंकर

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 55 ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर आहे. कोरोना हा गुणाकार करतो. मात्र, हा गुणाकार थोपवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं आहे. याशिवाय राज्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने परिस्थितीत थोडीफार नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आजही नियंत्रणात आलेला नाही. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होतोय. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 669 रुग्णांचा मृ्त्यू झालाय. रुग्णांचा मृत्यू आकडा कमी करणं हे सरकार आणि प्रशासनापुढील मोठं आव्हान आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरुच

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड उद्रेक सुरु आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे. यापैकी 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आज दिवसभरात 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं जरी असलं तरी बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. राज्यात काल दिवसभरात 63 हजारापेक्षाही जास्त रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात कालपेक्षा आज सहा हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले आहेत.