लग्नात फसवलं म्हणून नातं तोडू नका..; म्हणणाऱ्या राम कपूरला पत्नीकडून स्पष्ट उत्तर

'लॉक अप 2' या शोमध्ये लग्नातील फसवणूक आणि माफी याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर अभिनेता राम कपूर सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. यादरम्यान त्याची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

लग्नात फसवलं म्हणून नातं तोडू नका..; म्हणणाऱ्या राम कपूरला पत्नीकडून स्पष्ट उत्तर
Gautami Kapoor and Ram Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2026 | 9:42 AM

‘लॉक अप’ या शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि अगदी पहिल्या एपिसोडपासूनच हा शो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राम कपूर स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या सिझनमध्ये तो त्याच्या वागण्यामुळे आणि विविध टिप्पण्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये तो लग्नातील फसवणुकीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आला आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोलसुद्धा केलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या टिप्पणीवरून टीका होत असताना आता रामची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रामच्या वक्तव्याचा सर्वच बाजूंनी विरोध होत असताना त्याची पत्नी मात्र त्याला पाठिंबा देताना दिसतेय. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राम कपूरसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच तिने लिहिलं आहे, ‘Only Love’ (फक्त प्रेम) आणि त्यासोबत हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, गौतमीने राम कपूरचं समर्थन केलं आहे. इतकंच नाही तर गौतमीने अध्यात्मिक गुरू सदगुरू यांचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते प्रेम आणि विश्वास यांबद्दल बोलत आहेत. “जर प्रेम खरं असेल तर ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं. खरं प्रेम माणसाच्या भावनांना सुंदर बनवतं आणि विश्वास ही नात्याची सर्वांत मोठी ताकद असते”, असं ते यात म्हणत आहे. गौतमीची ही पोस्ट म्हणजे राम कपूरला दिलेला तिचा एक अप्रत्यक्ष पाठिंबा म्हणून पाहिली जात आहे.

गौतमी कपूरची पोस्ट-

काय म्हणाला होता राम?

‘लॉक अप 2’मध्ये राम कपूरने लग्न आणि नात्यांबद्दल त्याचे विचार मांडले होते. तो म्हणाला होता, “20-25 वर्षांचा संसार हा चांगल्या आणि वाईट काळाचा प्रवास असतो. कठीण काळात जर कोणाकडून चूक झाली, पण तुम्ही तुमच्या जोडीदार आणि मुलांशिवाय राहू शकत नाही, तर ती प्रत्येक जखम भरून निघते. प्रत्येक चूक हे नातं संपवण्याचं कारण बनू नये. कधी कधी अशा गोष्टी चुकून होतात.” त्याच्या या वक्तव्याचा अभिनेत्री आकांक्षा चमोलाने शोमध्ये तीव्र विरोध केला होता. अशा गोष्टी चुकून कधीच होत नसतात, असं तिने म्हटलं होतं. रामचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून नेटकऱ्यांनीही त्याला सुनावलं आहे.

याच शोमध्ये राम कपूने ऑनस्क्रीन किसिंग सीनवरही त्याचं स्पष्ट मत मांडलं होतं. तो म्हणाला होता, जर पतीने त्याच्या पत्नीला प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना दिली, तर चित्रपट किंवा मालिकांमधील किसिंग सीनचा नात्यावर परिणाम होत नाही. पत्नी गौतमीला त्याच्या पडद्यावरील किसिंग सीनबद्दल कधीच कोणतीही अडचण नव्हती, असंही त्याने म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us