Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. व्हेंटिलेटर स्फोटामुळे लागलेल्या या आगीत दुर्दैवाने तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशीसाठी समिती गठीत करण्याची घोषणा केली. आठ दिवसांत अहवाल सादर होऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

सोमवारी पहाटे अमरावतीमध्ये घडलेल्या भयानक घटनेने फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3.30 च्या सुमारास अचानक आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि बघता बघता तिने रौद्र रूप धारण केलं. या दुर्दैवी घटनेमध्ये तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर काही बाळं ही जखमी झाली. त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीच्या रुग्णालयातील या घटनेने अख्ख्या राज्यात हळहळ व्यक्त होत असून ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, ते कालबाह्य झाले होते का? त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. दरम्यान आगीच्या या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. आगीच्या या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. ‘ नवजात शिशूच्या मृत्यूच्या सखोल चौकशी साठी समिती गठीत करणार’ अशी घोषणा आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. आठ दिवसात त्या समितीचा अहवाल समोर येईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
काय म्हणाले प्रकाश आबिटकर ?
अमरावतीच्या रुग्णालयात ती घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. याच दुर्दैवी घटनेतून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि जे यासाठी दोषी असतील त्यांना जबाबदार धरावं लागेल. व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतला दोष असेल.. जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, आम्ही बाकी सगळं करू, पण जी तीन बालकं गेली, त्यांच्या कुटुंबियांना जे दु:ख झालं, ते कशानेही भरून येणार नाही. याइतकं दुर्दैवी काहीच नाही, असं आबिटकर म्हणाले. या घटनेमागे नेमकी कोणती कारणं आहेत, याचा सखोल तपास करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रुग्णालयातील फायर ऑडिट वेळेत झालं होतं का, त्यामध्ये काही त्रुटी किंवा विलंब झाला होता का, याचीही चौकशी केली जाणार आहे. रुग्णालयातील कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेमुळे ही दुर्घटना घडली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असंही त्यांनी सांगितले. फायर ऑडिटच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात उद्या विशेष बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं त्यांनी नमूज केलं.
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे हेल्थ कमिशनर संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालातून दुर्घटनेमागील नेमके कारण आणि संभाव्य जबाबदारी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
