राम कपूरने ओलांडल्या मर्यादा, 22 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला किस; अखेर पत्नीने हात जोडून मागितली माफी
'लॉक अप 2'मधील स्पर्धकांना भेटायला त्यांचे कुटुंबीय आले आहेत. यावेळी अभिनेता राम कपूरची पत्नी गौतमी कपूर ही श्रेया कालराची हात जोडून माफी मागते. श्रेयाने राम कपूरवर गैरवर्तनाचे आरोप केले होते. गौतमी तिला नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

भरभरून ड्रामा आणि मनोरंजनाच्या डोसदरम्यान आता ‘लॉक अप 2’ हा सिझन अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेपूर्वी त्यातील स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला लॉकअपमध्ये पोहोचले. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेता राम कपूर या सिझनमध्ये त्याच्या वादग्रस्त वागण्या-बोलण्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. शोदरम्यान त्याने इन्फ्लुएन्सर श्रेया कालराला बळजबरी किस केलं होतं. यानंतर आता लॉक अपमध्ये पोहोचलेल्या त्याच्या पत्नीने श्रेयाची माफी मागितली आहे. या शोमध्ये श्रेयाने अनेकदा राम कपूरच्या वागणुकीबद्दल आक्षेप नोंदवला होता. रामने सतत किस करणं मला पसंत नाही, असं तिने म्हटलं होतं. यावर आता रामची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी कपूरने हात जोडून तिच्या पतीच्या वागणुकीबद्दल माफी मागितली आहे.
गौतमी हात जोडून श्रेयाला म्हणाली, “जर त्याने तुला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असेल तर, जर त्याने तुझ्यावर थुकलं असेल तर त्याच्या बाजूने मी तुझी माफी मागते.” 30 वर्षीय श्रेया कालराने 52 वर्षीय राम कपूरवर अनेकदा मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला होता. एका एपिसोडमध्ये तिने थेट म्हटलं होतं, “राम कपूरने जर मला पुन्हा किस करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला स्पष्ट शब्दांत सांगेन की माझे पप्पाही मला इतके किस करत नाहीत.” श्रेयाच्या या वक्तव्यानंतर गौतमीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिचं मत मांडलं होतं.
पहा व्हिडीओ-
“खरंतर लॉकअप या शोबद्दल मी काहीच बोलणार नाही, असं ठरवलं होतं. पण गेल्या काही दिवसांतील प्रकार पाहून मी शांत राहू शकले नाही. म्हणूनच मी माझ्या पतीच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. अनेकजण राम कपूरला ‘ठरकी’ (सतत मुलींशी फ्लर्ट करणारा) म्हणत आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते की, तो असाच आहे. त्याचं मन खूप मोठं आहे. या शोमध्ये तो कोणत्याही प्लॅन किंवा स्ट्रॅटेजीशिवाय गेला आहे. म्हणून लोकांना त्याचं वागणं खटकतंय. राम खूपच दयाळू आणि प्रेमळ आहे. त्याने कित्येकांची मदत केली आहे. एखाद्या व्यक्तीला जवळून ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दल मत बनवणं किती सोपं असतं. हा खेळ फक्त मनाने नाही तर मेंदूनेही खेळा”, असं गौतमी म्हणाली होती.