Rani Mukerji: राणी मुखर्जीचं अस्खलित मराठी भाषण; मराठमोळ्या अंदाजाने जिंकली महाराष्ट्राची मनं!
राणीने तिच्या फिल्मी प्रवासाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केलं. अगदी कमी वयात इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आणि सुरुवातीच्या काळात कोणाचंही विशेष पाठबळ नसतानाही स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून पुढे जात राहिल्याचं तिने सांगितलं. तिच्यासाठी सिनेमा हा केवळ व्यवसाय नसून लोकांना समजून घेण्याचं आणि त्यांच्या भावना मांडण्याचं माध्यम असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर एका खास आणि भावनिक क्षणामुळे चर्चेत आहे. मुंबईत पार पडलेल्या 62 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणीला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारताना राणीने केलेलं मराठी भाषण आणि तिचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या खास सोहळ्यासाठी राणीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. साडीला लाल रंगाचा पदर असल्याने तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि केसात माळलेला गजरा यामुळे राणीचा संपूर्ण अंदाज अगदी मराठमोळा दिसत होता. तिच्या या पारंपरिक लूकने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
मात्र, राणीच्या लूकपेक्षाही तिच्या भाषणाची अधिक चर्चा झाली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने आपल्या भावना मराठीतून व्यक्त करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र हा केवळ एक राज्य नसून आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याची भावना तिने व्यक्त केली. मुंबईतच आपलं बालपण गेलं आणि याच शहराने आपल्याला आयुष्याचे तसेच सिनेमाचे अनेक धडे दिल्याचं राणीने सांगितलं.
पहा व्हिडीओ-
At the 62nd Maharashtra State Film Awards ceremony,Maharashtra Chief Minister @Dev_Fadnavis honoured #Rani_Mukerji with the prestigious “Raj Kapoor Special Contribution Award” for her outstanding contribution to Indian cinema.@Rani_mukherji pic.twitter.com/m2C2VGUI3b
— शुभम कराड (@shubham_9909) September 9, 2026
राणी मुखर्जीने तिच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ती म्हणाली, “माझ्यासाठी महाराष्ट्र एक राज्य नाही. महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. माझा जन्म मायानगरी मुंबईत झाला. मी माझं यश, अपयश.. सर्वकाही इथेच पाहिलं. प्रत्येक क्षण इथेच जगले. हे पारितोषिक मला राज कपूर यांच्या नावानं दिलं जातंय, याचा मला अभिमान आहे. मी लहान वयात सिनेसृष्टीत आले, त्यावेळी मला कुठपर्यंत जायचंय हे सुद्धा माहीत नव्हतं. मी देशातील महिला आणि तिची शक्ती चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला. सिनेमाकडे मी कधीच व्यवसाय म्हणून पाहिलं नाही, ती माझ्यासाठी एक भावना आहे.”
“महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. हे पारितोषिक मी राज्याच्या नागरिकांना आणि सिनेसृष्टीतील सर्व लोकांना समर्पित करते. मुंबईने मला माझी ओळख दिली, घर दिलं, सुरक्षा दिली. त्यामुळे मुंबईचं एक वेगळं स्थान माझ्या मनात आहे. महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. कारण मी कोण आहे, हे मला महाराष्ट्राने दाखवलं आहे. माझ्यावर हे प्रेम असंच राहू द्या. जय हिंद.. जय महाराष्ट्र,” अशा शब्दांत तिने भाषणाचा शेवट केला.