‘संपूर्ण देश बघतोय, एकनाथ शिंदे राजीनामा देणार का?’ काँग्रेस नेत्याच्या ट्विटवर दिग्गज निर्मात्यांची टिप्पणी चर्चेत

कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे. असं असलं तरी कायदेशीर लढाईला त्यांना सामोरं जावं लागणार आहे.

संपूर्ण देश बघतोय, एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? काँग्रेस नेत्याच्या ट्विटवर दिग्गज निर्मात्यांची टिप्पणी चर्चेत
Eknath Shinde
Image Credit source: tv9
| Updated on: May 12, 2023 | 10:23 AM

मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच त्याबाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी पुनर्स्थापित करण्याचा विचार केला असता असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांनी घेतलेल्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी काँग्रेस नेते संजय झा यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. ‘एकनाथ शिंदे राजीनामा देणार का’, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यावर दिग्गज निर्माते अशोक पंडित यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

काँग्रेस नेते संजय झा यांनी ट्विट करत लिहिलं, ‘राजकीय नैतिकतेच्या एका अंशाला कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृपया राजीनामा देणार का? भाजप, एकनाथ शिंदे, संपूर्ण भारत तुम्हाला बघतोय.’ या ट्विटला शेअर करत निर्माते अशोक पंडित यांनी लिहिलं, ‘जा झोप जा बाळा, तुला झोप येतेय.’

अशोक पंडित यांच्या या ट्विटवरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अशोक पंडित यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो’, असं एकाने लिहिलंय. तर ‘कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही फिल्ममेकर आहात. एक क्रिएटिव्ह व्यक्ती आणि अशी भाषा? अजब आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे की ठाकरे गटाच्या पाठीशी आहेत, याबाबत निवडणूक आयोग कोणता निर्णय देईल किंवा त्यावर आणि ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील प्रलंबित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुन्हा कोणती भूमिका घेईल, यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. राज्यपालांची कृती घटनाबाह्य होती, असे गंभीर ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ओढले आहेत.

कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे. असं असलं तरी कायदेशीर लढाईला त्यांना सामोरं जावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याने शिंदे आणि त्यांच्याबरोबरील 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात जाण्याची शक्यता फारच कमी आहे. शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us