
बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री तशा अनेक जाहिराती करत असतात. त्यातील एक जाहिरात नेहमी चर्चेत राहते आणि तिच्यावर अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित केलं गेलं आहे. पण आता या जाहिरातीमुळे तीन सुपरस्टार अभिनेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असं दिसतंय. ती जाहिरात म्हणजे पान मसाल्याची.
पान मसाल्याची जाहिरात करणे महागात
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याची जाहिरात करणे भरपूर महागात पडलं आहे. या तिघांविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच, कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरुद्ध कोटा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, हे कलाकार केशरयुक्त पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची फसवणूक करतायत. त्यामुळे आता आयोगाने या तीन बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी 21 एप्रिलपर्यंत उत्तर मागितलं आहे.
शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला समन्स
बॉलीवूड स्टार शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि विमल पान मसालाच्या निर्मात्यांना कोटा ग्राहक न्यायालयात समन्स बजावण्यात आले आहे. कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाकडे या सर्वांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि पान मसाल्याच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराचे नाव इंद्रमोहन सिंग हनी असून त्यांनी याचिकेत म्हटलं आहे की, 1 मे 2004 पासून देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतरही काही रुपयांसाठी या चित्रपट कलाकारांकडून दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे, ज्यामुळे तरुणवर्ग वेगळ्या मार्गाने जात आहेत
पानमसाल्यात केसर नसून तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप
इंद्रमोहन सिंग हनी पुढे म्हणालेत की, ‘बाजारात केशरची किंमत प्रति किलो 3 लाख रुपये आहे. पण पान मसाल्याचे उत्पादक आणि काही कलाकार त्याची खोटी जाहिरात करून विक्री करत आहेत. खरं तर, हे कलाकार ज्या कंपनीची जाहिरात करतात त्या कंपनीच्या जाहिरातीत ते ‘दाणे-दाणे में केसर का दम’ आणि ‘जुबाँ केसरी’ सारख्या पंच लाईन्स म्हणताना दिसतात.
मात्र भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातील कलाकार कोणत्याही प्रकारच्या नशेला किंवा समाजावर परिणाम करणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देत नाहीत.’ अशा परिस्थितीत त्यांच्या खोट्या प्रचाराचा तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी
दरम्यान ही याचिका 13 नोव्हेंबर 2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप नेते इंद्रमोहन सिंग हनी (अॅडव्होकेट) यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 89 अंतर्गत दाखल केली होती. याचिकेत म्हटल्याप्रमाणे केशरचा बाजारभाव प्रति किलो सुमारे 4 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, विमल पान मसाल्यात इतक्या कमी दरात केशर असल्याची दिशाभूल करणारी जाहिरात केली जात असल्यानं त्यावर करावाई करण्यात यावी असही त्यांनी म्हटलं आहे. तसेच विमल पान मसाला यांनी या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिलेले नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
याचिकाकर्त्याने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय त्यांच्यावर दंड आकारण्याची मागणीही करण्यात आली आहे. दंडाची रक्कम भारत सरकारच्या युवा मंत्रालयातील युवा कल्याण निधीमध्ये जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.
नोटीस बजावून न्यायालयात बोलावले
या तक्रारीवरून आयोगाचे अध्यक्ष अनुराग गौतम आणि सदस्य वीरेंद्र सिंग रावत यांनी 21 फेब्रुवारी 2025 रोजी शाहरुख, अजय, टायगर आणि विमल पान मसाला उत्पादकांना नोटीस बजावली आहे आणि त्यांना ग्राहक न्यायालयात बोलावण्यात आले आहे.