“तो माझ्या द्वेषाच्याही लायक..”; सलमान खानवर का भडकले अभिजीत भट्टाचार्य?

बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक हे त्यांच्या गाण्यांसोबतच बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. अभिजीत यांनी काही दिवसांपूर्वी सलमान खानवर निशाणा साधला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा सलमानविषयी वक्तव्य केलं आहे, ज्याची चर्चा होत आहे.

तो माझ्या द्वेषाच्याही लायक..; सलमान खानवर का भडकले अभिजीत भट्टाचार्य?
सलमान खान, अभिजीत भट्टचार्य
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 05, 2023 | 9:07 PM

मुंबई : 5 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांनी पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानवर निशाणा साधला आहे. 2015 मध्ये अभिजीत यांनी सलमानच्या हिट अँड रन केसनंतर एक ट्विट केला होता. या ट्विटद्वारे त्यांनी सलमानवर उपरोधिक टीका केली होती. बेघर लोकांनी रस्त्यावर झोपायला नाही पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अभिजीत यांनी सलमानवर पाकिस्तानी गायकांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा सलमानबद्दल अभिजीत भट्टाचार्य यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूब चॅनल ‘सेलिब्रेनिया स्टुडिओज’ला दिलेल्या या मुलाखतीत अभिजीत असं काही म्हणाले, जे ऐकल्यानंतर सलमानसोबतचा त्यांचा वाद आता कधीच मिटणार नाही, असे संकेत दिसत आहेत. सलमान माझ्या द्वेषाच्याही लायक नाही, असंच ते थेट म्हणाले.

सलमानवर साधला निशाणा

“मला वाटत नाही की तो माझ्या द्वेषाच्याही लायक आहे. सलमान फक्त त्याच्या गुडविलमुळे यशस्वी झाला आहे. तो देव नाही आणि त्याने स्वत:ला देव मानूही नये”, असं अभिजीत म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी त्या पाकिस्तानी कलाकारांची नावं सांगण्यास नकार दिला ज्यांना सलमानने पाठिंबा दिला होता. मात्र त्यांनी अरिजीत सिंगची जागा राहत फतेह अली खान यांनी घेण्याविषयी वक्तव्य केलं. “हे लज्जास्पद आहे. अरिजीत या देशातील सर्वांत मोठा गायक आहे आणि त्याने कधीच सलमानशी जुळवून घेण्याची विनंती करू नये. त्याऐवजी त्याने थेट सलमानकडे पाठ फिरवायला पाहिजे होती,” असं ते पुढे म्हणाले.

अरिजीत आणि सलमानचा वाद

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यातील वाद खूप जुना आहे. या वादामुळे सलमानने अरिजीतला त्याच्या चित्रपटात गाणं गाण्याची परवागनी दिली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांमधील वाद मिटल्याचं समोर आलं. अरिजीतने सलमानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटातील एक गाणं गायलं आहे.

पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या संधीबाबत अभिजीत भट्टाचार्य यांनी संताप व्यक्त केला होता. उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भट्टाचार्य म्हणाले होते, “काही चित्रपट निर्माते देशद्रोही आहेत, जे पाकिस्तानी कलाकारांना काम देत आहेत.”