रश्मिकाशी लग्न करणार का? चर्चांवर अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन

| Updated on: Feb 22, 2022 | 10:36 AM

पुढच्या वर्षी रश्मिका-विजय (Vijay Deverakonda & Rashmika Madanna) लग्नगाठ बांधणार असल्याच्या जोरदार चर्चा

रश्मिकाशी लग्न करणार का? चर्चांवर अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन
Vijay Deverakonda and Rashmika Madanna
Follow us on

‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ (Dear Comrade) यांसारख्या सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली जोडी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Madanna) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. चित्रपटांमधील रोमँटिक केमिस्ट्री या दोघांच्या खऱ्या आयुष्यातही पहायला मिळत असल्याचे अनेक तर्कवितर्क चाहत्यांनी लावले. अनेकदा या दोघांना डिनर डेट आणि पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. म्हणूनच हे दोघं ऑफस्क्रीन एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये आहेत. आतापर्यंत विजय किंवा रश्मिकाने या चर्चांवर काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यांनी या चर्चा फेटाळल्यासुद्धा नव्हत्या आणि स्वीकारल्यासुद्धा नव्हत्या. मात्र अचानक या दोघांच्या लग्नाच्या चर्चा समोर येताच विजयने मात्र सोशल मीडियाद्वारे चर्चांना उत्तर देण्याचं ठरवलं. विजयचं हेच ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढच्या वर्षी विजय आणि रश्मिका लग्नगाठ बांधणार असल्याचं वृत्त सोमवारी सर्वत्र पसरलं. सोमवारी दिवसभर या जोडीचीच चर्चा होती. अखेर रात्री विजयने ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. ‘नेहमीसारखाच मूर्खपणा आहे. आपल्याला अशा बातम्या खूपच आवडतात, नाही का?’, अशा शब्दांत विजयने उत्तर दिलं. विजयच्या या ट्विटमुळे लग्नाच्या आणि अफेअरच्या चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘लायगर’ या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. तर दुसरीकडे रश्मिकासुद्धा बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. याआधी तिनं दिग्दर्शक करण जोहरच्या कार्यालयात हजेरी लावली होती. ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूड पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी ती नुकतंच मुंबईला राहायला आल्याचंही म्हटलं जात आहे. २०२२ या नवीन वर्षाचं स्वागत करताना विजय आणि रश्मिका एकमेकांसोबत होते, अशा चर्चा होत्या. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते आणि त्या दोघांच्या फोटोंमधील ठिकाण गोवा असल्याचा अंदाज चाहत्यांनी वर्तविला होता.