Milind Gawali: अनिरुद्धची ‘ही’ पोस्ट वाचून तुम्ही कधीच म्हणणार नाही ‘आई कुठे काय करते’?

| Updated on: Jun 16, 2022 | 4:53 PM

'आज खूपच आठवण आली म्हणून थोडसं तिच्याविषयी लिहावसं वाटलं,' असं त्यांनी या पोस्टच्या शेवटी लिहिलंय. आईच्या काही खास आठवणी सांगत असतानाच त्यांनी त्यांचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे.

Milind Gawali: अनिरुद्धची ही पोस्ट वाचून तुम्ही कधीच म्हणणार नाही आई कुठे काय करते?
आईसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट
Image Credit source: Instagram
Follow us on

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेत अनिरुद्धची (Aniruddha) भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच त्यांच्या खऱ्या आयुष्यातील आईसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘आज खूपच आठवण आली म्हणून थोडसं तिच्याविषयी लिहावसं वाटलं,’ असं त्यांनी या पोस्टच्या शेवटी लिहिलंय. आईच्या काही खास आठवणी सांगत असतानाच त्यांनी त्यांचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इतकंच नव्हे तर आई कुठे काय करते, या प्रश्नाचं उत्तर इथेच आहे, असंदेखील एकाने कमेंटमध्ये म्हटलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

‘आई..माझी माय! सुशीला धोंडीराम निमसे.. लग्नानंतर सुशिला श्रीराम गवळी, लग्नाच्या तीन वर्षानंतर मिलिंदची आई. तिला छान वाटायचे मिलिंदची आई ऐकायला. धुळ्याला होती मग नाशिकला आली. आजोबा कामानिमित्त बरेच वेळा मुंबईला यायचे. तिची खूप इच्छा होती मुंबई बघायची पण आजोबा कधी तिला मुंबईला घेऊन आले नाहीत. पण मुंबई हे तिचं स्वप्न होतं. पाचवीपर्यंत शिक्षण झालं. आठ भावंड म्हणून आईला वयाच्या सातव्या वर्षापासून स्वयंपाकात घर कामात मदत करायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच सुगरण झाली. इतकी सुगरण की कोणीही तिच्या हातचं खाल्लं की जन्मात विसरायचा नाही. एकदा तर रत्नाकर मतकरींसाठी आईने पुरणपोळ्या केल्या होत्या. त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी त्या पुरण पोळ्यांविषयी लिहिलं होतं. कठीण कठीण पदार्थ ती अगदी सहज करायची. अनारसे, लाडू ,पन्नास पन्नास पोळ्या तर ती सहज लाटायची हसत-खेळत. तिला कळलं होतं की माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातं जातो. पोटभर चविष्ट खाल्लं की माणसाचं मन भरतं आणि एकदा का मन भरलं की त्या अन्नाची चव जन्मभर हृदयातनं जात नाही. आता आई नाहीये पण तिच्या हातच्या अन्नाची चव ही अनेकांच्या जिभेवर अजूनही ताजी ताजी आहे.’

हे सुद्धा वाचा

‘वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीराम गवळी यांचं स्थळ आलं. सब इंस्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि पोस्टिंग मुंबईत मिळालेलं. आता आयुष्यात कधीही मुंबई सोडून जायचं नाही हे तिने मनात निश्चय केला. हे आयुष्य कसं जगावं हे तिला कळलं होतं. फक्त निस्वार्थ प्रेम, भेदभाव न करता जगावर प्रेम करावं, जगण्यावर करावं. सगळे सण ती मनापासून साजरी करायची. नवरात्रीतले नऊ दिवस उपास, दिवाळी साजरी करायाची, शेजारच्या खान बहीणबरोबर ईदसुद्धा साजरी करायची, खाली राहणाऱ्या ख्रिश्चन कुटुंबाबरोबर क्रिसमससुद्धा साजरी करायची. रंगपंचमी हा तिचा आवडता सण. कुठल्याही धर्माचा विचार न करता बिनधास्तपणे त्यांनासुद्धा ती रंग लावायची. आज खूपच आठवण आली म्हणून थोडसं तिच्याविषयी लिहावसं वाटलं,’ अशा शब्दांत त्यांनी आईच्या आठवणी सांगितल्या.

पहा व्हिडीओ-

मिलिंद गवळी हे सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत जरी त्यांची भूमिका नकारात्मक असली तरी त्यांच्या अभिनयकौशल्याला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळते. शिवाय त्यांच्या सोशल मीडियावरही नेटकरी मोकळेपणे व्यक्त होत असतात.