‘लग्नाचा खरा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा..’; पतीला कॅन्सर निदान झाल्यानंतर अभिज्ञाची भावूक पोस्ट
लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच मेहुलला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. अभिज्ञा भावेनं (Abhidnya Bhave) सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टद्वारे तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

पहिल्या लग्नात आलेल्या कटू अनुभवांना विसरण्याचा प्रयत्न करत जानेवारी २०२१ मध्ये मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आणि मेहुल पै (Mehul Pail) यांनी दुसरं लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच मेहुलला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मेहुलची इव्हेंट कंपनी आहे. कॉलेजमध्ये असताना एका कार्यक्रमानिमित्त अभिज्ञा आणि मेहुलची पहिल्यांदा भेट झाली होती. लग्नापूर्वी जवळपास पंधरा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. मेहुलवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. तो आता ठीक असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अभिज्ञाने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली. अभिज्ञाने या पोस्टद्वारे तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. लग्नाचा खरा अर्थ काय, हे तिने यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिज्ञा भावेची पोस्ट-
‘आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला समजतं की लग्न म्हणजे फॅन्सी कपडे, महागडे दागिने, परफेक्ट फोटो, हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज नव्हे. लग्नाचा खरा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा तुम्हा दोघांची परीक्षा असते आणि तुम्ही एकमेकांना दिलेली वचनं फक्त एकमेकांच्या प्रेमासाठी खऱ्या अर्थाने पूर्ण करता. जेव्हा आयुष्य तुम्हाला दाखवतं की आनंद, हास्य, पार्टी, प्रवास, महागड्या भेटवस्तू, पैसा हे जीवनाचे एकमेव सत्य नाही. सत्य हे अस्वस्थ, असुरक्षित आहे. जेव्हा आयुष्य तुम्हाला त्याची फिल्टर न केलेली बाजू दाखवते आणि तरीसुद्धा ती हसतमुखाने स्वीकारण्याची शक्ती तुमच्यात असते. हेच एकमेकांवरचं खरं प्रेम आहे. हे खरं प्रेम न बोलता व्यक्त होतं. ते मौन, एकटं लढण्याची ती शक्ती म्हणजे प्रेम आहे. जेव्हा तुमची जवळची लोकं फक्त काळजी घेतात, तुम्ही न मागताही ते तुम्हाला मदत करतात. कठीण काळ खरोखर कठीण असतो, परंतु जीवनात स्पष्टता येण्यासाठी ते आवश्यक असतं,’ अशा आशयाची ही अभिज्ञाची पोस्ट आहे. या पोस्टच्या शेवटी तिने लिहिलं, अजिबात काळजी करू नका, मेहुल आता ठीक आहे आणि बरा होत आहे.
मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट करत लिहिलं होतं, ‘माझ्या आयुष्यात मला अनेक मूर्ख भेटले, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वांत मोठा आहे. मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस.’ या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अभिज्ञाची सर्वांत खास मैत्रीण मयुरी देशमुख हिनंसुद्धा कमेंट करत अभिज्ञा आणि मेहुलला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तू रॉकस्टार आहेत. ही लढाई तू नक्की जिंकणार’, असं तिनं लिहिलं आहे. ऋतुजा बागवे, अक्षया देवधर यांसारख्या कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.
संबंधित बातम्या: अभिज्ञा भावेच्या पतीला कॅन्सर; रुग्णालयातील फोटो आला समोर
संबंधित बातम्या: ‘मेमोरिज ब्रिंग बॅक’, अभिनेत्री अभिज्ञा भावेनं शेअर केले लग्नाचे फोटो