विठ्ठलाला साकडं घातलं अन् दोन दिवसातच सत्य समोर आलं, रुचिरा जाधवचे ब्रेकअपवर मोठं विधान, म्हणाली चुकीच्या घरात…

बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुचिरा जाधवने आपल्या ब्रेकअपवर आणि बिग बॉसमधील अनुभवावर दोन वर्षांनंतर मौन सोडले आहे. जर बिग बॉसमध्ये गेले नसते तर आज चुकीच्या घरात असते, असे खळबळजनक विधान तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

विठ्ठलाला साकडं घातलं अन् दोन दिवसातच सत्य समोर आलं, रुचिरा जाधवचे ब्रेकअपवर मोठं विधान, म्हणाली चुकीच्या घरात...
ruchira jadhav
| Updated on: Mar 29, 2026 | 3:47 PM

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. सध्या ती स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. रुचिरा ही कायमच तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यमुळेही चर्चेत असते. तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहे. आता रुचिरा जाधवने पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा प्रवास आणि त्यानंतर झालेला ब्रेकअप याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने कडू आठवणींतून ती कशी बाहेर पडली आहे, याबद्दलही खुलासा केला आहे.

माझ्या मनात नकारात्मकता होती

रुचिरा जाधवने नुकतंच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत रुचिराने विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. यावेळी तिला तिच्या ब्रेकअपबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्टीकरण दिले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुढची दोन वर्षे माझ्यासाठी खूपच कठीण होती. माझ्या मनात अनेक शंका होत्या. अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या नव्हत्या. बिग बॉसनंतर माझ्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ज्या प्रकारे लोकांसमोर आल्या, त्याबद्दलही माझ्या मनात नकारात्मकता होती, असे रुचिरा म्हणाली.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी मी खूप संभ्रमात होते. मी विठुरायाला फक्त एवढंच साकडं घातलं की, जे काही आहे ते सगळं नीट कर. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन-तीन दिवसांतच अशा काही गोष्टी समोर आल्या ज्या पूर्णपणे अनपेक्षित होत्या. या उलगड्यामुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला, असे रुचिराने सांगितले.

तिथे गेल्यामुळेच अनेक गोष्टींचे सत्य समोर आले

काही गोष्टी मला माहित होत्या, पण माझ्या पालकांपासून त्या लपवल्या होत्या. यामुळे माझे पालक आणि माझ्यामध्ये एक प्रकारचे अंतर निर्माण झाले होते. पालकांना ती चुकीची वाटत होती, पण जुलै महिन्यात मिळालेल्या क्लिअरिटीमुळे तो सगळा गैरसमज दूर झाला आणि पुन्हा एकदा कुटुंबात संवाद सुरू झाला. बिग बॉसनंतर मला आजही अनेक प्रेक्षकांचे मेसेज येतात. त्यांना मला हेच सांगायचे आहे की, जर मी त्यावेळी बिग बॉसच्या घरात गेले नसते, तर कदाचित आज मी चुकीच्या घरात असते. आज मी माझ्या हक्काच्या घरात सुरक्षित आहे. या सगळ्याचे श्रेय मी बिग बॉसला देते, कारण तिथे गेल्यामुळेच अनेक गोष्टींचे सत्य समोर आले, असे रुचिराने स्पष्टपणे म्हटले.

आता जुन्या आठवणी मागे सारल्या आहे. मी आता बिग बॉस हा शो आनंदाने पाहू शकते. यापूर्वी मला हा शो पाहताना मानसिक त्रास होत होता, पण आता मी जुन्या चुकांतून शिकून पुढे गेली आहे, असेही तिने सांगितले. दरम्यान रुचिराने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत ‘माया’ हे पात्र साकारलं होतं. तिची ही भूमिका प्रचंड गाजली होती. आता ती मितवा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Follow Us