एका ओळीच्या कथेवर बनले 3 सिनेमे, तिन्ही ब्लॉकबस्टर; मोडले कमाईचे रेकॉर्ड, छापले अंधाधुंद पैसे
कथा दमदार असली की चित्रपटाला प्रेक्षकांकडून हमखास दमदार प्रतिसाद मिळतो, असं म्हटलं जातं. फक्त एका ओळीच्या कथेवर आधारित आमिर खानने काही चित्रपट बनवले आणि हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

मार्च 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘धुरंधर 2’ गेल्या 50 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर कमाई करतोय. आतापर्यंत या चित्रपटाने 1829 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बॉलिवूडमधील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या या यशादरम्यान आमिर खानच्या ‘दंगल’ची सतत चर्चा होतेय. आमिरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा फक्त ओळीची होती. इतकंच नाही तर आमिरने अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय, ज्यांची कथा फक्त एका ओळीत सांगितली जाते. अशा तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
आमिरने त्याच्या एका मुलाखतीत स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला होता. आमिरने सांगितलं होतं की त्याचे वडील ताहिर हुसैन हे लेखकाकडून फक्त एका ओळीत चित्रपटाची कथा ऐकायचे. संपूर्ण तीन तासांच्या नरेशननंतर फक्त एका ओळीत ते कथा ऐकायचे. जे लेखक तीन तासांची कथा एका ओळीत सांगू शकायचे, फक्त त्यांच्याच चित्रपटांची निर्मिती ते करायचे. आमिर खानने त्याच्या वडिलांच्या या सवयीचा उपयोग स्वत:साठीही करून घेतला. त्याच आधारावर त्याने ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, ‘दंगल’ची कथासुद्धा फक्त एकाच ओळीची होती. ‘हमारी छोरियां छोरों से कम है के’ या एका ओळीच्या थीमवर संपूर्ण चित्रपट बनला होता. आमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “तुम्हाला चित्रपटातून नेमकं काय सांगायचं आहे? तुम्ही एका ओळीची कहाणी काय आहे? जर तुम्ही एका ओळीत कहाणी सांगू शकत नसाल तर मग तुमचा चित्रपट प्रेक्षकांनाहीच संभ्रमित करणारा असेल.”
‘दंगल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केल होतं. ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये आमिर खानने गीता फोगाट आणि बबीता फोगाट या कुस्तीपटू बहिणींची मुलाखत घेतली होती. त्यानंतरच त्याने त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं. यामध्ये त्याच्यासोबत साक्षी तंवर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका होत्या. अवघ्या वीस कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 2000 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा विक्रम अद्याप कोणीच मोडू शकलेला नाही. हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे.
या यादीत 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लगान’सुद्धा आहे. या चित्रपटाची कथासुद्धा फक्त एकाच ओळीची होती. आमिरने सांगितलं होतं की, लगानसारखा चित्रपट ‘जोपर्यंत आयुष्य, तोपर्यंत आशा’ हा संदेश देतो. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नये. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरने फक्त पाच मिनिटांत आमिरला सांगितली होती. हा चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचला होता. 24 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 66 कोटी रुपयांची कमाई केली होती.
आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपटसुद्धा तसाच आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावरून सुरुवातीला वादसुद्धा झाला होता. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि विधू विनोद चोप्रा याचे निर्माते होते. ‘सबका मालिक एक’ या एका ओळीवर चित्रपटाची कथा पुढे डेव्हलप करण्यात आली होती. देवाला भेटण्यासाठी कोणत्याही मिडल मॅनची गरज नाही, या मेसेजवर आधारित हा चित्रपट पूर्ण करण्यात आला होता. 122 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला होता आणि अवघ्या 13 दिवसांत ‘पीके’नं कमाईचे अनेक विक्रम मोडले होते. या चित्रपटाने जगभरात 792 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.