तुफान पाऊस तरी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी, रामरक्षा आंदोलनात ठाकरेंची तोफ कडाडली, हिंदूंना जागे होण्याची साद!
लोक रेनकोट, छत्र्या घेऊन लोक आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या होत्या. तसेच गळ्यात भगव्या रंगाचे गमछे घालून आंदोलनाच्या ठिकाणी अनेकांनी गर्दी केली होती.

UBT Shiv Sena Protest : पक्षात फूट पडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज्य पिंजून काढत आहेत. बंड केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांत जाऊन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांत उत्साह पेरण्याचा प्रयत्न केला. आता उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथिती आर्थिक गैरव्यवहाराविरोधात उद्धव ठाकरेंनी आता दंड थोपडले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भर पावसात मुंबईच्या दादर परिसरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले. मुंबईत तुफान पाऊस असूनही ठाकरेंच्या या आंदोलनाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.
आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच निषेध केला होता. यावेळी त्यांनी भाजपा, सत्ताधाऱ्यांवर जाहीर आरोप केले होते. तसेच 5 जुलै रोजी मुंबईत रामरक्षा आंदोलनाची हाक दिली होती. सध्या मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे. मुंबई, उपनगरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु भर पावसात ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली होती. विशेष म्हणजे भर पावसात या आंदोनाला उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, नेते सुभाष देसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत तसेच इतर नेते उपस्थित होते.
भर पावसात रामरक्षा आरती
लोक रेनकोट, छत्र्या घेऊन लोक आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या होत्या. तसेच गळ्यात भगव्या रंगाचे गमछे घालून आंदोलनाच्या ठिकाणी अनेकांनी गर्दी केली होती. भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनात अगोदर रामरक्षा आरती झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण करून समस्त हिंदूंनी जागे राहावे, तुम्ही गाफील राहावं, यासाठी प्रयत्न केला जातोय असं आवाहन केलं.
पाऊस आला तरीही ठाकरेंचे जोरदार भाषण
तसेच, अयोध्येतील राम मंदिरात ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात खुद्द उद्धव ठाकरे हेदेखील चिंब पावसात उभे होते. त्यांचे कपडे पावसाच्या पाण्याने भिजले होते. तरीही त्यांनी आंदोलनात भाग घेऊन सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
