“माझ्या फ्लाइटमधून धूर दिसत होता”; लॉस एंजेलिसमधील आगीतून बचावल्याचा टीव्ही अभिनेत्रीचा थरारक अनुभव
लॉस एंजेलिसमधील जंगलातील आगीमुळे सगळंच जळून राख झालं आहे. अनेकांनी आपला जीव गमावला तर, अनेकांनी कसाबसा आपला जीव बचावला. यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी दोखील होते. आता हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री सुद्धा या घटनेतून थोडक्यात बचावली आहे. तिने तिचा हा भयानक अनुभव शेअर केला आहे.

लॉस एंजेलिसमधील आगीची घटनेची माहिती आता सर्व जगभर पसरली आहे. या आगीमध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सची घरे जळून खाक झाली तर अनेक स्थानिकांनी आपला जीव गमावला. जे या भयानक घटनेमधून बचावले आहेत ते सर्व आपले अनुभव समोर येऊन सांगताना दिसत आहेत. त्यात आता या प्रसंगातून थोडक्यात बचावलेली टीव्ही अभिनेत्रीने देखील तिचा हा अनुभव सांगितला आहे.
टीव्ही अभिनेत्री आगीच्या घटनेतून थोडक्यात बचावली
ही अभिनेत्री म्हणजे रुपल त्यागी. रुपल त्यागीने सांगितले की, घरी जाण्यापूर्वी ती हॉलिवूडचे साइन पाहण्यासाठी त्याच रस्त्यावर गाडी चालवली होती. आगीमुळे त्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ती पुढे म्हणाली की, ” या आगीत सर्व काही जळून खाक झाले, हे दृश्य पाहून माझे हृदय हेलावलं’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.
टीव्ही अभिनेत्री रूपल त्यागी लॉस एंजेलिसमध्ये दोन महिन्यांसाठी सुट्टीवर गेली होती. शिवाय ती तिथे शिकतही होती, पण परत येताना तिथे आगीमुळे जो थैमान घातलेलं पाहून ती तिच्या सर्व चांगल्या आठवणी विसरून गेली.
“मला फ्लाइटमधून धूर दिसत होता पण….”
रुपल म्हणाली की ” तेथील कोरडे हवामान पाहता, जंगलातील आग ही त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट होती पण यावेळी ती इतकं भीषण रुप धारण करेल याचा विचार कधी केला नव्हता. मला माझ्या फ्लाइटमधून धूर निघताना दिसला आणि काय होत आहे हे मला कळत नव्हतं. पण मुंबईला पोहोचल्यावर मला ही घटना समजली. आग कशी पसरली आणि त्यामुळे सगळं कसं जळून खाक झालं हे समजल्यावर मन हेलावून गेलं” असं म्हणत तिने दु:ख व्यक्त केलं आहे.
रुपल पुढे म्हणाली की “लॉस एंजेलिसमध्ये घालवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक सुंदर आठवण आहे, पण या घटनेनंतर मात्र मी पूर्ण हादरले आहे. माझे सगळे मित्र मंडळी सुरक्षित स्थानी आहेत त्यामुळे मला समाधान आहे पण तरी त्यांची काळजी वाटतेच. तसेच मी ही घटना होण्याआधीच तिथून मुंबईकडे निघाले होते, त्यामुळे मी थोडक्यात बचावले यासाठी मी देवाचे आभार मानते” असं म्हणत रुपलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्या काय होईल यावर विश्वास नाही
रुपल ने हे सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी प्रार्थना केल आहे “अशा घटनांमुळे आपले आयुष्य किती बेभवशाचं आहे याची आठवण होते. एक आनंदी शहर एका दिवसात जळून राख होईल, हे अविश्वसनीय आहे. दुसऱ्या दिवशी काय होणार हे आपल्याला कधीच कळत नाही. मला खरोखर आशा आहे की जे लोक या घटनेनं होरपळले आहेत ते लवकरच त्यांचे जीवन पुन्हा सुरु करतील” अशी आशाही तिने व्यक्त केली.