45 दिवस एकत्र राहून फुलली मैत्री, पण ‘या’ कारणामुळे राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय यांची मैत्री तुटली

'आम्ही कायम मैत्रिणी राहू...' ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीच्या घट्ट मैत्रीचं नातं कसं तुटलं? जुन्या मुलाखतीतील खुलासा पुन्हा चर्चेत.

45 दिवस एकत्र राहून फुलली मैत्री, पण या कारणामुळे राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय यांची मैत्री तुटली
| Updated on: Jun 28, 2026 | 12:23 PM

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या मैत्रीपेक्षा त्यांच्यातील स्पर्धेच्या चर्चा अधिक रंगतात. मात्र एकेकाळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांची मैत्री इंडस्ट्रीत आदर्श मानली जात होती. दोघींनी अनेक प्रसंगी एकमेकींबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला होता. आता ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली असून, त्यात तिने राणीसोबतच्या मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले होते.

एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय वर्ल्ड टूरदरम्यान जवळपास 45 दिवस एकत्र राहण्याची संधी मिळाल्याने दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. प्रवास, स्टेज शो, सराव आणि कुटुंबीयांसोबत घालवलेला वेळ यामुळे त्यांचे नाते अधिक दृढ झाले होते.

‘जीना इसी का नाम है’ या कार्यक्रमात बोलताना ऐश्वर्याने सांगितले होते की, लोकांना असे वाटते की एकाच चित्रपटसृष्टीतील दोन अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी असू शकत नाहीत. पण ते खरे नाही. राणी अत्यंत मनमिळावू, मैत्रीपूर्ण आणि सहज स्वभावाची आहे. आमच्यात कधीच दुरावा किंवा संकोच नव्हता.

या कार्यक्रमात राणी मुखर्जीनेही ऐश्वर्यासाठी एक खास व्हिडिओ संदेश पाठवला होता. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ती कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नव्हती. मात्र तिने संदेशातून ऐश्वर्याविषयीचे प्रेम व्यक्त केले.

का तुटली दोघांची मैत्री?

राणी म्हणाली होती, ऐश, तुला माहीत आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला कार्यक्रमाला येता आलं नाही याचं वाईट वाटतं. पण तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. मला हे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सांगायचं आहे की, मी तुझ्यावर प्रेम करते आणि आपण कायम चांगल्या मैत्रिणी राहू.मात्र, ही मैत्री फार काळ टिकली नाही. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, 2003 मध्ये ‘चलते-चलते’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सुरुवातीला या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या रायची निवड करण्यात आली होती. मात्र नंतर तिच्या जागी राणी मुखर्जीला संधी देण्यात आली.

या बदलानंतर दोघींमधील संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर ऐश्वर्या आणि राणी यांच्यातील मैत्री हळूहळू संपुष्टात आल्याचे बोलले गेले. एकेकाळी अतिशय घट्ट असलेले हे नाते पुढे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिलेल्या मतभेदांपैकी एक ठरले. तथापि, ऐश्वर्या राय किंवा राणी मुखर्जी यांनी या कथित दुराव्याबाबत सार्वजनिकरित्या फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मैत्री तुटण्यामागील अनेक दावे हे प्रामुख्याने माध्यमांतील वृत्तांवर आधारित असून, त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Follow Us