राज्यात लॉकडाऊन हवा की नको?; वाचा, कोण कोण काय म्हणालं

| Updated on: Mar 30, 2021 | 12:51 PM

राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. (lockdown again in maharashtra?, what political leaders says?)

राज्यात लॉकडाऊन हवा की नको?; वाचा, कोण कोण काय म्हणालं
lockdown
Follow us on

मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेतही दिले आहेत. मात्र, विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही पक्षांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच लॉकडाऊनबाबत एकवाक्यता नसल्याने राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. लॉकडाऊनबाबत कुणी काय मत मांडले त्याचा घेतलेला हा आढावा. (lockdown again in maharashtra?, what political leaders says?)

नवाब मलिक काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही काल लॉकडाऊनला विरोध केला होता. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं. लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनला आमचा विरोध: चंद्रकांतदादा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. राज्याला आता लॉकडाऊन परवडणार नाही. तुम्ही निर्बंध कडक करा, हरकत नाही. पण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही आणि आम्ही त्याला कडाडून विरोध करू, असं पाटील म्हणाले. तसेच लॉकडाऊन लावण्या आधी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत करावी, त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये, असंही ते म्हणाले. प्रत्येक झोपडीत काही ना काही उद्योग चालत असतो. तो बंद झाला तर त्यांच्या उपासमार येईल. राज्यात एक कोटी असंघटीत कामगार आहे. मागच्यावेळी त्यांना काहीच पॅकेज दिलं नाही. यावेळीही त्यांना पॅकेज देणार नाही आणि घरी बसा म्हणून सांगणार हे चालणार नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी केली.

लॉकडाऊनवर मतभेद नाहीत: टोपे

लॉंकडाऊन वरना कुठलाही मतभेद नाही. लॉकडाउन कोणालाही सक्रिय नसतो मुख्यमंत्र्यांनाही लॉकडाउन करावा अशी इच्छा नाही. महाराष्ट्रात एकही व्यक्ती नाही की त्याला लॉकडाऊन पाहिजे आहेत. तहान लागल्यावर विहीर खणायची अशी म्हण आहे.आपण तशी तयारी करत आहोत. ती तयारी कशी आहे त्यावर लक्ष ठेवून आहोत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. त्याचा विचार करायला हरकत नाही, मात्र गेल्यावेळेसारखा लॉकडाऊन परवडणारा नाही, असंही ते म्हणाले.

लॉकडाऊन परवडणार नाही: पडळकर

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. कोणतेही उपाय करायचे नाहीत. मात्र लॉकडाऊन करायचा हे योग्य नाही. लॉकडाऊन हा उपाय नाही, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात सरकारला वारंवार पत्रं लिहून चाचण्या कमी करू नका असं सांगितलं. चाचण्या वाढवण्याची विनंती केली. मात्र, या सरकारने मधल्या काळात चाचण्याच बंद करून टाकल्या. त्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. नियोजनाच्या अभावामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचं पडळकर म्हणाले.

लॉकडाऊनला विरोध नाही: जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आमचा लॉकडाऊनला विरोध नसल्याचं म्हटलं आहे. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करून भाजपने आमच्यात भांडणं लावू नयेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

पुन्हा लॉकडाऊन नकोच: निरुपम

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. मुंबईत पुन्हा लॉकडाऊन नको. गेल्यावेळी लॉकडाऊन झाल्याने राज्याची आर्थिक स्थिती ढासळली होती. लोक त्रस्त झाले होते. गावाकडे पलायन करण्याची लोकांवर वेळ आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्यात येऊ नये, असं आवाहन निरुपम यांनी आघाडी सरकारला केलं.

लॉकडाऊन शेवटचा उपाय: मुश्रीफ

लॉकडाऊन हा शेवटचा उपाय आहे. अशी संख्या वाढत गेली तर संक्रमण तोडण्यासाठी, कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे, असं सांगतानाच आम्ही चंद्रकांत पाटलांना समजावू. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत, असा चिमटा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला.

मुर्खपणा केला तर लोक रस्त्यावर उतरतील: संदीप देशपांडे

मनसेही लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचं नुकसान होणार आहे ते सरकार भरून देणार आहे का? आम्हाला बारमधून तीन लाख रुपये हप्ता येत नाही, असा टोला मनसेचे महासचिव संदीप देशपांडे यांनी लगावला. साधी सर्दी झाली आणि टेस्ट केलं तरी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट येतो. या सर्व गोष्टी लक्षात घ्यावा. लोकं आता लॉकडाऊन मानायला तयार नाहीत. हा मुर्खपणा किंवा आततायीपणा केल्यास लोकं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. (lockdown again in maharashtra?, what political leaders says?)

तर आम्ही रस्त्यावर उतरू: इम्तियाज जलील

लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादमध्ये 8 तारखेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. पण उद्योग सुरू होणार आहेत. त्यात लाखो कामगार आहेत. मग त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? की केवळ उद्योग लॉबीला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. (lockdown again in maharashtra?, what political leaders says?)

 

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : येवल्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sandeep Deshpande | लॉकडाऊन केल्यास लोक रस्त्यावर उतरतील : संदीप देशपांडे

आधी गर्भातलं बाळ गेलं, मग 19 वर्षीय माऊलीचा मृत्यू, सोलापुरातील घटनेने हळहळ

(lockdown again in maharashtra?, what political leaders says?)