पावसाळ्यात होणाऱ्या अतिसार टाळण्यासाठी ‘या’ प्रतिबंधात्मक टिप्सचे करा पालन
देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार पडत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर या काळात पावसाळ्यातील आजार होत असतात. तर पावसाळ्यात जुलाबाचा धोका वाढतो. पावसाळ्याच्या दिवसात अतिसारपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाची खबरदारी घेतल्यास तो टाळता येतो. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

पावसाळा ऋतू सुरू होताच हंगामी आजार डोकं वर काढतात. तर अशा परिस्थितीत विविध संसर्गांचा धोकाही वाढतो. परिणामी या दिवसांमध्ये अतिसाराच्या घटनांमध्येही वाढ होऊ शकते. दूषित पाणी, दूषित अन्न आणि अस्वच्छता ही याची मुख्य कारणे आहेत. बरेच लोकं याला केवळ पोटदुखी समजून दुर्लक्ष करतात. परंतु वेळेवर खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अतिसारामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते. यावर त्वरित उपाय न केल्यास, निर्जलीकरण, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात आहार आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. चला तर मग पावसाळ्यात अतिसार टाळण्यासाठीचे उपाय तसेच कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि कोणत्या बाबतीत लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
पावसाळ्यात जुलाब टाळण्यासाठी काय करावे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) अतिसार टाळण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्यावे. पाण्याच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास वापरण्यापूर्वी ते पाणी उकळावे किंवा गाळावे. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण्यापूर्वी शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि मुलांना स्वच्छ केल्यानंतर आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत.
नेहमी ताजे आणि पूर्णपणे शिजवलेले अन्न खा. उघड्यावर ठेवलेले किंवा जास्त काळ बाहेर ठेवलेले अन्न खाणे टाळा. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी पूर्णपणे धुवा. घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला स्वच्छता राखा आणि खाद्यपदार्थांवर माश्या व कीटक बसू नयेत म्हणून ते झाकून ठेवा. जुलाब झाल्यास पुरेसे पाणी प्या आणि गरज भासल्यास ओआरएस (ORS) प्या. जर त्रास वाढला किंवा जास्त काळ टिकून राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अतिसाराच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
वारंवार पातळ शौचास होणे, उलट्या होणे, तीव्र ताप, पोटात तीव्र वेदना किंवा शौचातून रक्त पडणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
याव्यतिरिक्त जास्त तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, लघवी कमी होणे, चक्कर येणे किंवा तीव्र अशक्तपणा ही डिहायड्रेशनची त (dehydration) लक्षणे असू शकतात.
जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये ही लक्षणे झपाट्याने गंभीर होऊ शकतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
कोणत्या लोकांना अतिसाराबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे?
लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनी अतिसाराच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त कुपोषित किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये अतिसार पटकन गंभीर होऊ शकतो.
अशा लोकांनी स्वच्छ पाणी पिण्याकडे, ताजे अन्नपदार्थ खाण्याकडे आणि शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जुलाबाची लक्षणे दिसल्यास विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)