
india canada tension : भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. भारताने कॅनडातील मुत्सद्दींची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. यासाठी भारताने १० ऑक्टोबरची डेडलाईन देखील दिली आहे. या वाद सुरु असताना भारत कॅनडामधील संबंध ताणले जात आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ही आता कॅनडाच्या पंतप्रधानांना झापलं आहे. SpaceX चे संस्थापक एलोन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. लोकांचे भाषण स्वातंत्र्य दडपल्याचा आरोप मस्क यांनी ट्रुडो यांच्यावर केला आहे. कॅनडा सरकारच्या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी ट्रुडो सरकारवर टीका केली आहे.
कॅनडा सरकारने नवा अध्यादेश काढला आहे ज्यामध्ये सर्व ऑनलाइन स्टीमिंग सेवा सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकेल. कॅनडा सरकारच्या या आदेशावर वेगवेगळ्या स्तरातून आता टीका होऊ लागली आहे. पत्रकार आणि लेखक ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिल कॅनडा सरकारवर टीका केलीये.
ज्यामध्ये त्यांनी कॅनेडियन सरकारने जगातील सर्वात दडपशाही ऑनलाइन सेन्सॉरशिप योजना आणली असल्याचं म्हटलं आहे. पॉडकास्ट असलेल्या सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांना सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदणी करायला सांगून सरकार ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांवर नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ग्लेन ग्रीनवाल्डच्या या पोस्टला उत्तर देताना एलोन मस्क यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘ट्रूडो कॅनडातील भाषण स्वातंत्र्य संपवू इच्छितात, हे लज्जास्पद आहे.’ कॅनडाच्या ट्रूडो सरकारवर भाषण स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही.
याआधी फेब्रुवारी 2022 मध्ये, ट्रूडो सरकारने आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला होता आणि कॅनडाच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. खरं तर, कोरोना महामारीच्या काळात ट्रक चालकांनी कोरोनाची लस घेण्याच्या आवश्यकतेला विरोध केला होता. त्यानंतर कॅनडाच्या सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधही सध्या ताणले गेले आहेत. जूनमध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला. भारताने कॅनडाचे आरोप मूर्खपणाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमुळे भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे.