india-maldive row: मालदीवने अखेर मान्य केली चूक, भारताबाबत केले मोठे वक्तव्य

India Maldive : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे सत्तेत आल्यापासून त्यांचा कल चीनकडेच असल्याचे दिसत आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत-मालदीवचे संबंध बिघडले होते. शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय सैनिकांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर तणाव वाढला, पण आता मालदीवने चूक मान्य केली आहे.

india-maldive row: मालदीवने अखेर मान्य केली चूक, भारताबाबत केले मोठे वक्तव्य
shailesh musale | Updated on: Sep 16, 2024 | 9:48 PM

भारत आणि मालदीवचे संबंध गेल्या काही दिवसांपूर्वी बिघडले होते. मालदीवमध्ये नवीन सरकार आल्यानंतर दोन्ही देशात तणावाचा वातावरण तयार झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. पण याचा मोठा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतीयांनी मालदीवला जाण्याचे रद्द केले. त्यानंतर मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारतीयांना त्यांच्या देशात येण्याचं आवाहन करावे लागले होते. मालदीवचे प्रमुख हे चीन समर्थक असल्याने चीनला खुश करण्यासाठी त्यांनी भारतासोबत पंगा घेण्याचा प्रयत्न केला. यावर आता मालदीवच्या परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी पहिल्यांदाच ही गोष्ट मान्य केली आहे की, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सुरुवातीच्या काळात भारत-मालदीव संबंध कठीण टप्प्यातून गेले आहेत. परंतु आता दोन्ही देशांनी गैरसमज दूर केले आहेत. जमीर यांनी शुक्रवारी श्रीलंका दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले होते.

भारतीय सैन्याला माघारी पाठवले

जमीर म्हणाले की, भारतासोबतच्या संबंधांना आव्हानांना सामोरे जावे लागले, विशेषत: मालदीवमधून भारतीय सैन्याच्या छोट्या तुकडी हटवण्याच्या अध्यक्ष मुइज्जू यांच्या मोहिमेनंतर. ते म्हणाले की, मालदीवमधून भारतीय सैन्याच्या माघारीनंतर दोन्ही देशांमधील ‘गैरसमज’ दूर झाले आहेत. ‘द एडिशन’ वृत्तपत्राने जमीर यांच्या हवाल्यातून म्हटले आहे की, ‘तुम्हाला माहिती आहे की, आमच्या सरकारच्या सुरुवातीच्या काळात (भारताशी) काहीसा तणाव होता. भारत आणि चीनसोबत आमचे चांगले संबंध आहेत आणि दोन्ही देशांनी मालदीवला सतत पाठिंबा दिला आहे.

मुइज्जू यांचा चीनकडे अधिक कल

मुइज्जू यांचा चीनकडे कल असल्याचे म्हटले जाते. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत-मालदीवचे संबंध बिघडू लागले. शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मुइज्जू यांनी मालदीवमध्ये तैनात केलेले भारतीय सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर तेथे भारतीय सैनिकांच्या जागी तांत्रिक कर्मचारी तैनात करण्यात आले.

मुइज्जू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते भारताच्या दौऱ्यावर आले नाहीत. याआधी राष्ट्राध्यक्ष होणारा व्यक्ती सुरुवातीला भारत दौऱ्यावर येत होते. पण मुइज्जू आधी तुर्कस्तानला गेले आणि त्यानंतर जानेवारीत त्यांच्या पहिल्या राज्यभेटीसाठी चीनची निवड केली. त्यानंतर भारताने 9 जून रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळ ते उपस्थित होते. मुइज्जू यांच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष लवकरच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत.

जमीर यांनी मालदीवसमोरील सध्याची आर्थिक आव्हाने ‘तात्पुरती’ असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की मालदीवची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मदत पॅकेजची विनंती करण्याची कोणतीही योजना नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us