India Iran Relation : अखेर भारताने इराणला झुकवलं, मोठी मागणी मान्य

India Iran Relation : भारताचे इराण बरोबर चांगले संबंध आहेत. पण अमेरिकेच्या धोरणानुसार इराणकडून तेल खरेदी बंद केल्यामुळे इराणची भारतावर नाराजी आहे. त्यातूनच मागच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी घटना घडली होती.

India Iran Relation : अखेर भारताने इराणला झुकवलं, मोठी मागणी मान्य
India-Iran
| Updated on: May 10, 2024 | 3:03 PM

इराणने 13 एप्रिलला भारतात येणारे मालवाहू जहाज MSC एरीज ताब्यात घेतलं होतं. इराणने जे जहाज जप्त केलेलं, त्यावर पोर्तुगालचा झेंडा होता. पण या जहाजाच कनेक्शन इस्रायलशी होतं. त्यावेळी इराण-इस्रायलमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. इस्रायलने सीरियामध्ये इराणी दूतावासावर एअर स्ट्राइक केला. यात इराणी सैन्याचे अधिकारी मारले गेले होते. त्यामुळे बदला घेण्यासाठी इराणची तडफड चाललेली. त्याचवेळी इस्रायलशी कनेक्शन असलेलं हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतलं होतं. या जहाजामध्ये चालक पथकासह 25 सदस्य होते. यात 17 भारतीय होते. 12 भारतीयांची आधीच सुटका झाली होती. पाच भारतीय इराणने आपल्या ताब्यात ठेवले होते. अखेर त्या पाच जणांची सुद्धा सुटका करण्यात आली आहे.

सुटका झालेले पाचही भारतीय तेहरानहून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने या बातमीची पुष्टि केली आहे. भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 1 एप्रिलला सीरियाच्या दमिश्कमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. यात इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या टॉप ऑफिशियलसह 16 लोकांचा मृत्यू झाला. मालवाहक जहाज एमएससी एरीज लंडनस्थित जोडियाक मॅरीटाइमशी संबंधित आहे.

इराणच्या राजदूताला हजर व्हायला सांगितलेलं

जोडियाक मॅरीटाइम इस्रायली अब्जाधीश इयाल ओफरच्या जोडियाक ग्रुपचा भाग आहे. इराणने 27 एप्रिलला घोषणा केली होती की, बाकी सदस्यांची सुद्धा सुटका होईल. जहाजावर पोर्तुगालचे लोक सुद्धा होते. पोर्तुगालने जहाज आणि चालक दलाच्या सुटकेसाठी 16 एप्रिलला इराणच्या राजदूताला हजर व्हायला सांगितलं होतं.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फिरवलेला फोन

आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री एच अमीर अब्दुल्लाहियन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. सर्व 17 भारतीयांची सुटका करण्याची मागणी केली होती. सध्याच्या या भागातील स्थिती बाबतही चर्चा केली होती. संयम बाळगून कूटनितीकडे परतण्याचा सल्ला दिला होता.