
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने पुकारलेल्या संयुक्त युद्धाचे आता जगावर हळूहळू परिणाम दिसू लागले आहेत. इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलमध्ये सुद्धा जिवीतहानीपेक्षा वित्तहानी जास्त झाली आहे. पण या युद्धात इराणने जे तंत्र अवलंबलय त्यामुळे ते आता जगाला एक भयानक संकटाच्या दिशेने घेऊन चालले आहेत. हे भयानक संकट आहे तेलाचं. इराणने आखाती देशातील तेल प्रकल्पांवर हल्ले केलेत. त्यामुळे काही देशांनी आपल्या प्रमुख तेल रिफायनरी बंद केल्या आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज मधून वाहतूक करणाऱ्या तेल टँकर्सवर इराणकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे त्या मार्गाने होणारी तेल वाहतूक जवळपास ठप्प आहे. आज हा लेख लिहित असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर प्रति तेलपिंप 85 डॉलरवर आहेत. काल सोमवारी हेच दर प्रति तेलपिंप 115 डॉलरपर्यंत पोहोचले होते. भविष्यात हे युद्ध असचं सुरु राहिलं, तर कच्चा तेलाचे दर भडकून प्रचंड महागाई वाढू शकते. तेलाचा हाच खेळ समजून घेऊया.
फेब्रुवारी महिन्यात Brent Crude च्या किंमतींमध्ये 8 टक्के वाढ आधीच झाली आहे. अजून हे दर असेच चढे राहिले, तर कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवू शकतात. एक्सपर्ट्सच म्हणणं आहे की, इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष असाच सुरु राहिला, तर कच्चा तेलाच्या किंमत 150 ते 200 डॉलर प्रति तेल पिंपापर्यंत पोहोचू शकतात. कालच प्रति तेलपिंपाचे दर 115 डॉलरपर्यंत पोहोचल्याने भारताचं टेन्शन वाढलं होतं. आज 85 डॉलरवर असलेले दरही चांगले संकेत नाहीत. हे युद्ध सुरु राहिल्यास भारताच्या आर्थिक चिंता वाढू शकतात.
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून किती टक्के तेलाची वाहतूक होते?
मिडल ईस्टमधील वाढता तणाव सगळ्या जगाचं नुकसान करणारा आहे. भारतावर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. कारण भारत आपल्या गरजेच्या 90 टक्के कच्चं तेल दुसऱ्या देशाकडून आयात करतो. यात निम्मं तेल आखाती देशांमधून येतं. त्याशिवाय इराण प्रमुख तेल उत्पादक देश आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज इराणच्या कंट्रोलमध्ये आहे. इराणने आता तिथेच हल्ले करण्याची धमकी दिल्याने जगाची चिंता वाढली आहे. त्यांनी एका ऑइल टँकरवरही हल्ला करुन आपण काय करु शकतो हे दाखवून दिलय. जगातील 20 टक्के कच्चा तेलाची वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून होते.
भारताकडे एकूण किती कोटी लिटर कच्चा तेलाचा साठा आहे?
भारताकडे सध्या 250 मिलियन कच्चं तेल आणि पेट्रोलियम उत्पादनं राखीवमध्ये आहेत. दोन महिने पुरेल इतका हा साठा आहे. हा एकूण साठा 4000 कोटी लिटरचा आहे. भारताची ऊर्जा गरज लक्षात घेता सात ते आठ आठवडे पुरेल इतकं हे तेल आहे. 10 वर्षांपूर्वी आपण 27 देशांकडून तेल विकत घेत होतो. पण आता 40 देशांकडून तेल विकत घेतो. स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातला एक महत्नवाचा तेल मार्ग आहे. भारताचं 40 टक्के कच्चं तेल या अरुंद समुद्र मार्गावरुन येतं. उर्वरित 60 टक्के कच्चं तेल आपण दुसऱ्या देशांकडून विकत घेतो. यात रशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि मध्य आशिया हे देश आहेत. अलीकडे भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केलं.
किती हजार वस्तू बनवण्यासाठी कच्चा तेलाचा वापर होतो?
जवळपास 6000 वस्तू बनवण्यासाठी कच्चा तेलाचा कच्चा माल म्हणून वापर होतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोजच्या जगण्यात वापरल्या जाणाऱ्या जवळपास 90 टक्के वस्तूंमध्ये कुठल्या ना कुठल्या रुपात कच्चा तेलाचा वापर होतो.कच्चा तेलाचा जवळपास 70 ते 80 टक्के हिस्सा पेट्रोल, डिझेल, जेट फ्यूल, एलपीजी, केरोसिन सारखी इंधनं बनवण्यासाठी वापरला जातो. त्याशिवाय प्लास्टिक, पॉलिएस्टर, नायलॉन, सिंथेटिक लेदर, रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्तू उदहारणार्थ सिरिंज, ग्लोव्हज, हार्ट वॉल्व, कृत्रिम अंग बनवण्यासाठी सुद्धा कच्चा तेलाचा वापर होतो. कॉस्मेटिक प्रोडक्ट्स लिपस्टिक, काजळ, फाउंडेशन, नेल पॉलिश, शॅम्पू, शेविंग क्रीम, वॅसलीनमध्ये कच्चा तेलाचा वापर होतो. त्याशिवाय डामर, फर्नेस ऑइल, लुब्रिकेंट्स बनवण्यासाठी सुद्धा कच्चा तेलाचा वापर होतो.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल?
यावरुन तुम्हाला अंदाज येईल कच्चं तेल महागल्यास कुठल्या कुठल्या गोष्टी महाग होतील. कच्चं तेल महागल्यास एका झटक्यात या वस्तुंचे दर वाढतील. महागाई आपोआप वाढेल. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल.
आणखी सात दिवस युद्ध चालल्यास महामंदी येईल का?
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध आणखी सात दिवस चाललं तर जगाला 1929 सालच्या महामंदी सारख्या संकटाचा सामना करावा लागू शकतो असं भाकीत स्कॉटलंडची संस्था वुड मॅकेंजीने वर्तवलं आहे. 1929 साली अमेरिकेतून ही महामंदी सुरु झाली. 1939-40 पर्यंत जग या मंदीच्या फेऱ्यात अडकलेलं. 1929 साली वॉल स्ट्रीटवर शेअर बाजार कोसळला. बँका बुडाल्या, उत्पादन घसरलं आणि रेकॉर्ड बेरोजगारी निर्माण झाली. एकट्या अमेरिकेत 1933 साली 1.5 कोटी लोक बेरोजगार झाले होते.
सध्या सुरु असलेल्या युद्धात जिंकतय कोण?
सध्या सुरु असलेल्या युद्धात जिंकतय कोण? याचा विचार केल्यास अमेरिका-इस्रायलने इराणचं प्रचंड नुकसान केलय हे नाकारुन चालणार नाही. पण त्याचवेळी इराणही या युद्धात अजूनही या दोन देशांसमोर टिकून आहे ही सुद्धा एक मोठी बाब आहे. अमेरिका-इस्रायलकडे असलेली शस्त्रास्त्रांची राक्षसी शक्ती लक्षात घेता इराणचं अजूनही पाय रोवून उभं राहणं हे सुद्धा कुठल्या विजयापेक्षा कमी नाही. अमेरिका-इस्रायलच्या तुलनेत इराणकडे फक्त मिसाइल आणि ड्रोन्सची शक्ती होती. त्या बळावर ते नेटाने लढतायत. हार मानलेली नाही. आखाती देशांच्या तेल प्रकल्पांवर हल्ला करण्याचा त्यांचा निर्णय आणि स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याची धमकी याचे परिणाम आता दिसू लागलेत. तेल संकटामुळे अमेरिका-इस्रायलवर दबाव वाढू लागला आहे. हे युद्ध लवकरच थांबेल असं डोनाल्ड ट्रम्प आजच म्हणाले. अमेरिका-इस्रायल त्यांच्या रणनितीक उद्दिष्टांपासून अजूनही बरेच लांब आहेत. त्यामुळे कोण जिंकतय याचा निष्कर्ष तुमच्या समोर आहे.