अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय बेपत्ता, भारताने US च्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलवून जाब विचारला
भारताने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी नवी दिल्लीत अमेरिकेच्या 'चार्ज डी अफेयर्स' ना बोलवून घेतलं व कठोर शब्दात विरोध नोंदवला.

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका कमर्शियल जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर एकूण 28 जण होते. यात 24 भारतीय होते. या हल्ल्यानंतर 3 भारतीय बेपत्ता आहेत. 21 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. 10 जूनची ही घटना आहे. भारताने या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. सेटेबेलो नावाच्या जहाजावर हा हल्ला झाला. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. तीन बेपत्ता भारतीयांचा शोध घेण्यासाठी सुरु असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची ओमानच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. “इराणी बंदरांच्या नाकाबंदीसाठी सुरु असलेल्या अमेरिकी ऑपरेशनचा हा परिणाम आहे. याआधी सुद्धा क्रू ला सांगण्यात आलं आहे की, हल्ल्याच्या स्थितीत जहाजाच्या पाठीमागच्या भागाऐवजी पुढे जमा व्हा” ब्रिटिश मॅरीटाइम सिक्योरिटी ग्रुप एम्ब्रेच्या हवाल्याने रॉयटर्सने हे म्हटलं आहे.
भारताने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी नवी दिल्लीत अमेरिकेच्या ‘चार्ज डी अफेयर्स’ ना बोलवून घेतलं व कठोर शब्दात विरोध नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सेक्रेटरी नागराज नायडू यांनी सेटेबेलो टँकरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे ‘चार्ज डी अफेयर्स’ जेसन मीक्स यांना बोलवून घेतलं. भारताने जहाजावरील हल्ल्याची निंदा केली. समुद्रात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.
भारताने काय म्हटलय?
अमेरिकी सेंट्रल कमांडने या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अस्थिरतेवर भारताने चिंता व्यक्त केली. भारताने या समुद्री हल्ल्याला थेट त्या भागतील भ-राजकीय तणावाशी जोडलं. या भागात सतत जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून या भागातील संघर्षाचा थेट परिणाम असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. शांतता प्रस्थापित होण्यासाठी तात्काळ युद्धविराम आणि कूटनितीक चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा असं भारताने आवाहन केलं आहे.
भारताचा आग्रह काय आहे?
जागतिक व्यापार मार्गाला भू-राजकीय तणावापासून दूर ठेवलं पाहिजे अशी भारताची भूमिका आहे. कमर्शियल जहाजांना टार्गेट करु नका अशी भारताने मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्याचे सक्तीने पालन करुन महत्वाच्या जलमार्गावरून जहाजांची ये-जा कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरु ठेवा असा भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आग्रह केला आहे.