
Donald Trump And Vladimir Putin Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नुकतेच अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ट्रम्प यांच्यात एक महत्त्वाची बैठक पर पडली. या बैठकीत मात्र युद्धबंदीचा कोणताही करार झाला नाही. दरम्यान, आता लवकरच पुतिन, ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांची एकत्र बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या बैठकीनंतर सप्टेंबर महिन्यात भारताचं टेन्शन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुतिन, ट्रम्प आणि झेलेन्स्की हे तिन्ही नेते बैठकीसाठी एकाच मंचावर आल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चेअंतर्गत युक्रेनमधील लुहान्स्क, डोनेत्स्क हे भाग रशियाला सोपवण्यावर एकमत होऊ शकतं. तसेच युक्रेन क्रिमियावरील आपला दावा सोडू शकतो. विशेष म्हणजे युक्रेन नाटो देशांचा सदस्य होण्याची मागणीही मागे घेण्यावर या बैठकीत एकमत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केली जात आहे. युक्रेनने या सर्व अटी मान्य केल्यास युक्रेनला सुरक्षेची हमी दिली जाऊ शकते.
लवकरच होणाऱ्या या बैठकीत वरील मुद्द्यांवर एकमत झाल्यास एका प्रकारे अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले आहेत, असे म्हटले जाऊ शकते. युक्रेनने या अटी मान्य केल्यास रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास या दोन्ही देशांत गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेले शीतयुद्ध संपुष्टात येऊ शकते. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले अमेरिका आणि रशिया या दोन्ही देश एकमेकांच्या हातात हात टाकून मार्गक्रमण करू शकतात.
ही गृहितके सत्यात उतरली तर भारताला आपले पाऊल जपून टाकावे लागेल. अमेरिकेवर दाबव कायम राहावा यासाठी भारताने नेहमीच रशियाशी आपले संबंध चांगले कसे राहतील याची काळजी घेतलेली आहे. अमेरिकेसोबत चांगले संबंध नसल्यामुळे अगोदर पाकिस्तानच्या मुद्द्यावर भारताला रशियाचा पाठिंबा मिळायचा. मात्र अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधांत सुधारणा झाल्यास रशिया पाकिस्तानविरोधात भारताची साथ देईल का? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळेच भारताला यापुढे जपून पाऊल टाकावे लागेल. ट्रम्प-पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठक ही यशस्वी ठरल्यास भारताचे टेन्शन एकाप्रकारे वाढू शकते. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.