नरेंद्र मोदींमुळे जगात भारत नव्या उंचीवर, दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन!

जर्मनीत सध्या TV9 नेटवर्कच्या न्यूज ग्लोबल समिटच्या जर्मनी एडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर उपस्थित होते. यावेळी त्यांनी दहशतवाद, जर्मनी-भारत यांच्यातील संबंध यावर भाष्य केले.

नरेंद्र मोदींमुळे जगात भारत नव्या उंचीवर, दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन!
anurag thakur
| Updated on: Oct 09, 2025 | 6:13 PM

Anurag Thakur : सध्या जर्मनीत TV9 नेटवर्कच्या न्यूज ग्लोबल समिटच्या जर्मनी एडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. जर्मनीच्या स्टटगार्ट येथे न्यूज 9 ग्लोबल समिटचे हे दुसरे एडीशन होत आहे. पहिले सत्र गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करम्यात आले होते. गेल्या वर्षीच्या आयोजनात “India and Germany: A Roadmap for Sustainable Growth” हा विषय होता. तर यावेळी “Democracy, Demography, Development: The India-Germany Connect.” ही थिम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या समिटमध्ये माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी भारताची प्रगती, भारत-जर्मनी यांचे संबंध यावर महत्त्वपूर्ण भाषण केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामळे भारत आता…

अनुराग ठाकुर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर भारताला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे, असे मत व्यक्त केले. आता भारताचा चेहरा बदलला आहे. आता नव्या भारताची ओळख ही नाविन्यता आणि स्टार्टअप्सच्या रुपात होत आहे. जागतिक पातळीवर भारताची भूमिका वाढत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामळे भारत आता नवा ग्लोबल ऑर्डर झाला आहे, असेही यावेळी अनुराग ठाकुर म्हणाले.

लवकरच भारत सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था

अनुराग ठाकुर यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. “भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत जगातील सर्वात मोठी तिसरी म्हणून नावारुपाला येईल. आमच्याकडे मजबूत आणि स्थिर सरकार आहे. आमचे सरकार लोकशाही मार्गाने काम करत आहे,” असे मत यावेळी ठाकूर यांनी व्यक्त केले.

दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार

न्यूज9 ग्लोबल समिट 2025 च्या मंचावर अनुराग ठाकुर यांनी दशतवादी कारवाया आणि पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवाद यावरही भाष्य केले. “भारताने काही महिन्यांपूर्वीच पहलगाम येथे एक दहशतवादी हल्ला झेललेला आहे. त्या दहशतवाद्यांनी हल्ला करण्याआधी लोकांना धर्म विचारला. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, ते सर्वांनाच माहिती आहे. भारत आता प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार आहे,” असे मत यावेळी ठाकूर यांनी व्यक्त केले. तसेच पाकिस्तानचे थेट नाव न घेता भारताच्या शेजारी देशात दहशतवाद पोसला जात आहे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी भारत आणि जर्मनीच्या संबंधांवरही भाष्य केले. भारत आणि जर्मनी एकमेकांचा विश्वासू भागिदार आहेत, असे ठाकूर म्हणाले.