‘भारत छोडो आंदोलना’ची ठिणगी पडली आणि इंग्रजांना पळता भुई थोडी झाली

| Updated on: Aug 07, 2021 | 10:07 AM

भारत छोडो आंदोलनानंतरच भारतावर राज्य करणं इथून पुढे सोपं असणार नाही हे इंग्रजांच्या लक्षात आलं आणि इंग्रज भारत सोडून जाण्याच्या प्रक्रियेचा पाया रचला गेला.

भारत छोडो आंदोलनाची ठिणगी पडली आणि इंग्रजांना पळता भुई थोडी झाली
भारत छोडो आंदोलन
Follow us on

ज्या दिवशी भारतीयांनी इंग्रजांना ‘भारत सोडून जा’ असं ठणकावून सांगितलं तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट 1942. 15 ऑगस्ट 1947 च्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर इंग्रजांचा ‘युनियन जॅक’ (Union Jack) खाली उतरला आणि त्याजागी भारताचा ‘तिरंगा’ फडकवण्यात आला आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वतंत्र भारतात श्वास घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. (The Quit India Movement of the Indian Freedom Fighters started the process of the British leaving India.)

इंग्रज भारत सोडण्याचा पाया

15 ऑगस्ट 1947 ला भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली असली तरी या स्वातंत्र्यलढ्याची (Indian Independent Movement) सुरूवात कित्येक वर्ष आधी झाली होती. या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या. ज्यापैकी एक होती ‘भारत छोडो आंदोलन’ (Quit India Movement). या आंदोलनानंतरच भारतावर राज्य करणं इथून पुढे सोपं असणार नाही हे इंग्रजांच्या लक्षात आलं आणि इंग्रज भारत सोडून जाण्याच्या प्रक्रियेचा पाया रचला गेला.

कसं सुरू झालं भारत छोडो आंदोलन?

1942 च्या जुलै महिन्यात मुंबईत काँग्रेसचं (Congress) अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनात महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) इंग्रजांविरोधात आपलं तिसरं मोठं आंदोलन पुकारलं. 8 ऑगस्ट 1942 च्या संध्याकाळी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये ‘भारत छोडो आंदोलाना’चा (Quit India Movement) प्रस्ताव ठेवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्टला संपूर्ण देशात इंग्रज राजवटीविरोधात एक लाट पसरली. या प्रस्तावावरून काँग्रेसमध्ये मतभेद झाले, काँग्रेस नेते राजगोपालचारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. पण पंडित नेहरू (Pandit Jawaharlal Nehru)आणि मौलाना आझाद (Maulana Azad) महात्मा गांधींच्या बाजुने उभे राहिले आणि ‘भारत छोडो आंदोलना’ची ठिणगी पडली.

इंग्रजांना पळता भुई थोडी!

पाहता पाहता महात्मा गांधींच्याआवाहनाचा परिणाम संपूर्ण देशभर पाहायला मिळाला. लोक इंग्रजांविरोधात पेटून उठले. याच आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी ‘करो वा मरो’चा (Do or Die) नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोक रस्त्यावर उतरले. इंग्रजांना आता भारत सोडायला भाग पाडणं हाच एकमेव उद्देश त्यांच्यासमोर होता. भारतीय नागरिकांचा रोष पाहाता इंग्रजांनीही तातडीनं पाऊलं उचलली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आणि क्रातीकारकांना जेरबंद केलं. महात्मा गांधींनाही अहमदनगरच्या तुरूंगात नजरकैदेत ठेवण्यात आलं.

याचा परिणाम असा झाला की, लोक अधिक आक्रमक झाले. या आंदोलनादरम्यान इंग्रजांच्या अत्याचारात 940 भारतीयांचा मृत्यू झाला. दीड हजारहून अधिक नागरिक जखमी झाले. तब्बल 60 हजार स्वातंत्र्यसैनिकांनी अटक करवून घेतली. ऑगस्ट ते डिसेंबर 1942 दरम्यान संपूर्ण देशात पोलीस आणि इंगज सैन्यानं भारतीयांवर 538 वेळा गोळीबार केला. (The Quit India Movement of the Indian Freedom Fighters started the process of the British leaving India)

अखेर इंग्रज नरमले…

1943 च्या अखेरपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा हा वणवा संपूर्ण भारतभर पसरला होता. तोपर्यंत इंग्रजांना कळून चुकलं होतं की, भारतावर राज्य करणं आता तितकसं सोपं राहिलेलं नाही. त्यानंतर इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे संकेत दिले. सत्ता भारतीयांच्या हाती सोपवण्यासाठी सहमती दर्शवली. यानंतर महात्मा गांधींनी आंदोलन मागे घेतलं.

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. यासोबतच हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही, तर त्यासाठी रक्त सांडावं लागलं आहे याची जाणीवही करून देतो. आज ऑगस्ट क्रांतीदिनी तुमच्या-माझ्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध उभे ठाकलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतीकारांना नमन.