निसर्गाचं सौंदर्य, धुक्याची चादर, मुंबई-पुण्याजवळील 10 प्रसिद्ध ठिकाणं

| Updated on: Jul 12, 2019 | 9:18 PM

मुंबई : यावर्षीच्या उन्हाळ्यात लाहीलाही झाल्यानंतर पावसानेही प्रतीक्षा करायला लावली. पण जूनच्या शेवटी चांगला पाऊस झाल्यामुळे आता निसर्गाचं सौंदर्यही फुललं आहे. मुंबई आणि पुण्याजवळ अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे पावसाळ्यात पर्यटकांची कायम गर्दी होते. तुम्हीही या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या. माथेरान मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणामुळे वैताग […]

निसर्गाचं सौंदर्य, धुक्याची चादर, मुंबई-पुण्याजवळील 10 प्रसिद्ध ठिकाणं
Follow us on

मुंबई : यावर्षीच्या उन्हाळ्यात लाहीलाही झाल्यानंतर पावसानेही प्रतीक्षा करायला लावली. पण जूनच्या शेवटी चांगला पाऊस झाल्यामुळे आता निसर्गाचं सौंदर्यही फुललं आहे. मुंबई आणि पुण्याजवळ अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे पावसाळ्यात पर्यटकांची कायम गर्दी होते. तुम्हीही या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या.

माथेरान

मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणामुळे वैताग आला असेल तर माथेरानसारखं दुसरं ठिकाण नाही. दाट धुक्याची चादर, सतत पाऊस आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या स्थळावर पर्यटकांची कायम गर्दी असते. एक ते दोन दिवसांच्या पिकनिकसाठी माथेरान हे परफेक्ट ठिकाण आहे. माथेरानचं अंतर पुण्याहून 119 किमी ते मुंबईहून 150 किमी आहे.

लोणावळा-खंडाळा

डोळ्यात भरुन घ्यावंसं वाटणारं सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं सौंदर्य पाहण्यासाठी लोणावळा आणि खंडाळा हे अत्यंत सोयीचं ठिकाण आहे. लोणावळ्याचं अंतर मुंबईहून 93 आणि पुण्याहून 70 किमी आहे. प्रवास करतानाच डोंगररांगांचं सौंदर्य पर्यटकांना खुणावतं. शिवाय डोंगरातून कोसळणारे धबधबे या ठिकाणी आकर्षित करतात.

ताम्हिनी घाट

निसर्गाच्या सौंदर्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे ताम्हिनी घाट. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठीही हे अत्यंत सोयीचं ठिकाण आहे. विशेष म्हणजे तुम्हाला दुचाकीवर जायचं असेल तर ताम्हिनी घाट आणखी आकर्षित करतो. धबधबे आणि फुललेलं निसर्गाचं सौंदर्य हे ताम्हिनी घाटाचं वैशिष्ट्य आहे. धुक्याची चादर पर्यटकांना या ठिकाणी खिळवून ठेवते. मुंबईहून ताम्हिनी घाटाचं अंतर जवळपास दीडशे किमी आहे, तर पुण्याच्या पर्यटकांना फक्त 53 किमी प्रवास करावा लागतो.

मुळशी धरण

ताम्हिनी घाट पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी जवळच असलेलं मुळशी धरण ही एक पर्वणी आहे. मुळशी धरणाभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य खऱ्या अर्थाने वर्षा पर्यटनाचं समाधान देणारं आहे.

सिंहगड

पुण्याहून अगदी अर्ध्या ते एक तासाच्या अंतरावर असलेल्या सिंहगडावरही वर्षा पर्यटनासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. पुण्याहून सिंहगड फक्त 37 आणि मुंबईहून 180 किमी आहे. सिंहगडावरील पदार्थही प्रसिद्ध आहेत. प्रत्येक पर्यटक पिठलं-भाकरी खाऊनच परत येतो.

भीमाशंकर

लाखो भाविकांचं भक्तीस्थान आणि बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक भीमाशंकरही पर्यटनासाठी अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. भीमाशंकरचं अंतर पुण्याहून 127 किमी, तर मुंबईहून 213 किमी आहे.

माळशेज घाट

निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासोबतच ट्रेकिंग करण्यासाठी माळशेज घाट हे देखील एक पसंती दिलं जाणारं ठिकाण आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून येण्यासाठी सोयीचं असलेलं हे ठिकाण मानलं जातं. एरवी दरड कोसळण्याच्या घटनांमुळे चर्चेत असणारा माळशेज घाट पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात आकर्षिक करतो. माळशेजचं अंतर मुंबईहून 126 किमी, तर पुण्याहून 119 किमी आहे.

पाचगणी

पाचगणी हे मुंबईतील पर्यटकांना लांब असलं तरी पुणेकरांसाठी मात्र पर्वनीच आहे. सिडनी पॉईंट, वेण्णा लेक हे स्थळं पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तर खवय्यांसाठीही पाचगणीमध्ये प्रसिद्ध पदार्थ मिळतात. पाचगणी पुण्याहून फक्त 99 किमी, तर मुंबईहून 241 किमी आहे.

टापोला, सातारा

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं टापोला गाव हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सातारा जिल्ह्यात गेल्यानंतर हे स्थळ चुकवणारे पर्यटक क्वचितच मिळतात. पाचगणीहून फक्त 45 किमी असलेल्या या ठिकाणचं सौंदर्य मनाला समाधान देणारं आहे.

ठोसेघर धबधबा, सातारा

पावसाळ्यात धबधब्यावर जाण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. पुण्याहून पुढे निघाल्यानंतर साताऱ्याचा प्लॅन असेल तर ठोसेघर धबधबा पर्यटकांची वाट पाहतोय. ठोसेघर धबधबा पुण्याहून 134, तर मुंबईहून 277 किमी आहे.