नवी दिल्ली: भारताच्या तीनही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला. इतिहासात पहिल्यांदाच तीनही दल अर्थात भूदल,नौदल आणि वायूदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी भारताच्या यशाचे आणि पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे दाखवले. पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे पुरावे भारतीय लष्कराकडून सादर करण्यात आले.
यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, पाकिस्तानी विमानं 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत आली होती. पाकिस्तानने भारतीय सैन्य ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही पाकिस्तानच्या F16 हे विमान पाडलं. दोन बॉम्ब पाकिस्तानकडून टाकण्यात आले, मात्र त्यात काही नुकसान झालं नाही.
आम्हाला जे टार्गेट करायचे होते, ते आम्ही केलं, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आता सरकारला ते पुरावे जेव्हा मांडायचे असतील, ते मांडतील – भारतीय लष्कर
पाकिस्तान सातत्याने खोटं बोलतंय. आधी पाकिस्तानने 2 भारतीय पायलट पकडल्याचा दावा केला, मात्र नंतर त्यांनी कोलांटउडी मारुन एकच पायलट पकडल्याचं म्हटलं. याशिवाय भारतीय विमानं पाडल्याचा खोटा दावाही त्यांनी केला. भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे, त्याला भारताकडून सडेतोड उत्तर दिलं जात आहे, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं.
पाकने भारतीय आर्मीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता,आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे, ते जोपर्यंत दहशतवाद संपवणार नाहीत, तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय सैन्य
तीनही सैन्य दलाने दावा केला की पाकिस्तानातील बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यांवर केलेली कारवाई यशस्वी ठरली. मात्र नेमके किती दहशतवादी ठार झाले हे सांगणे कठीण आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आर्मीचे मेजर जनरल सुरेंद्रसिंग मेहल, नेव्ही रिअर अॅडमिरल दलविंदरसिंग गुज्जर आणि हवाईदलाचे व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
LIVE UPDATE
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन शेकडो दहशतवादी ठार केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राईकचा प्रयत्न होत आहे.पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. यामध्ये जवळपास साडेतीनशे दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्ट्राईकमुळे पाकिस्तानची चांगलीच भांबेरी उडाली. यांनंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत त्यांची विमानं घुसवली, मात्र भारताने त्यांचं एक विमान हवेतच उडवलं. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण यंत्रणांची महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे.
दरम्यान दुपारी भारत-पाकिस्तानच्या तणावाबाबत पंतप्रधान कार्यालयामध्ये दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु आहे. बैठकीत तीनही दलाचे प्रमुखांसह आयबीचे प्रमुख आणि रॉचे प्रमुखही उपस्थित होते.