दिल्लीत अतिप्रदूषण, आरोग्य आणीबाणी लागू, शाळा-कॉलेज बंद

| Updated on: Nov 01, 2019 | 4:08 PM

दिल्लीमध्ये हवेचा स्तर दिवसेंदिवस विषारी होत चालला आहे (Delhi-NCR Pollution). शुक्रवारी सकाळी 8 वाजता Air Quality Index (AQI)चा स्तर 459 होता. दिल्लीचा AQI स्तर धोकादयक पातळीवर आहे.

दिल्लीत अतिप्रदूषण, आरोग्य आणीबाणी लागू, शाळा-कॉलेज बंद
Follow us on

नवी दिल्ली : दिवाळीचा आनंद साजरा केल्यानंतर दिल्ली-एनसीआर आता विषारी हवेच्या विळख्यात अडकले आहे. दिल्लीमध्ये हवेचा स्तर दिवसेंदिवस विषारी होत चालला आहे (Delhi-NCR Pollution). शुक्रवारी सकाळी 8 वाजता Air Quality Index (AQI)चा स्तर 459 होता. दिल्लीचा AQI स्तर धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी लागू केली आहे (Public Health Emergency in Delhi-NCR).

शाळांना 5 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर

दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाला पाहता सर्व शाळांना 5 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, सर्व प्रकारच्या बांधकामांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत (Public Health Emergency in Delhi-NCR). त्याशिवाय दिल्लीमध्ये फटाके फोडण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये हवेत प्रदूषणाचा स्तर गुरुवारी रात्री अचानक मोठ्या प्रमाणात वाढला. दिल्लीच्या प्रदूषणाने आता ‘अतिगंभीर’ श्रेणीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ही आरोग्यविषयक आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ‘दिल्लीमध्ये पेंढ्यांच्या वाढत्या धुरामुळे प्रदूषणाच्या स्तरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने 5 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ट्वीट केजरीवाल यांनी केलं.

विशेषज्ञांच्या मते, आणखी तीन दिवस हे प्रदूषणाचं धुकं राहण्याची शक्यता आहे.

प्रदूषणाला पंजाब आणि हरियाणा सरकार जबाबदार : केजरीवाल

दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या या प्रदूषणाला पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून जाळल्या जाणाऱ्या पेंढ्या जबाबदार आहे. त्यामुळे या प्रदूषणासाठी पंजाब आणि हरियाणा सरकार जबाबदार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

‘शेजारी राज्यांमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेंढ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे दिल्लीला गॅस चेंबरचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे आपण स्वत:चं संरक्षण करणे अत्यंत गरजेचं आहे’, असं ट्वीट केजरीवाल यांनी केलं. तसेच, ‘दिल्ली सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये वाटण्यासाठी 50 लाख N95 मास्क खरेदी केलं आहे. मी दिल्लीच्या लोकांना विनंती करतो की, जिथेही गरज असेल तिथे यांचा वापर करावा’, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं.

बांग्लादेशच्या खेळाडूंची मास्क घालून नेट प्रॅक्टिस

येत्या 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर भारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बांग्लादेशी खेळाडू दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र, दिल्लीतील प्रदूषणामुळे या खेळाडूंना मास्क घालून नेट प्रॅक्टिस करावी लागत आहे.