‘या’ राज्यांमध्ये मद्यविक्री पुन्हा सुरु, तळीरामांच्या रांगाही लागल्या

आसाममध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत, तर मेघालयमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे (Assam Meghalaya government permits sale of liquor)

या राज्यांमध्ये मद्यविक्री पुन्हा सुरु, तळीरामांच्या रांगाही लागल्या
| Updated on: Apr 13, 2020 | 4:37 PM

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीची दुकानं बं असल्याने देशभरातील तळीरामांना चुटपूट लागून राहिली आहे. तूर्तास दोन राज्यांच्या शासनाने थोडा काळ मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यात सात तासांसाठी मद्यविक्री सुरु झाली आहे. (Assam Meghalaya government permits sale of liquor)

देशव्यापी 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना आसाम आणि मेघालय या दोन राज्यांनी मद्यविक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आसामच्या उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. के. मेधी यांनी शासन आदेश जारी केला. तर मेघालय सरकारनेही तसे आदेश काढले आहेत.

आसाममध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत, तर मेघालयमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 13 एप्रिल म्हणजे आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही बंधनकारक असेल. त्यानुसार दुकानासमोर खडूने गोल आखण्यात आले आहेत. मद्य खरेदीसाठी आलेले ग्राहक शिस्तीत रांगा लावताना पहिल्या दिवशी तरी दिसत आहेत.

‘कोरोना’मुळे देशात जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. या काळात दारु मिळत नसल्याने आत्महत्या, मृत्यू इथपासून मद्यचोरी आणि तस्करीपर्यंत अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यातून समोर येत होत्या.

केरळमध्ये मद्यपी आत्महत्या करत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर सरकारने व्यसनाधीन मद्यपींकडे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असल्यास दारु देण्याची घोषणा केली होती. (Assam Meghalaya government permits sale of liquor)