बेळगाव सीमाप्रश्नाचा फटका वृद्ध जोडप्याला? 3 दिवसांपासून जीव मुठीत घेऊन घराच्या छतावर

| Updated on: Aug 08, 2019 | 4:52 PM

बेळगाव सीमाप्रश्न मदतकार्य करताना परिणाम करत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगाव तालुक्यातील कडपूर गावामध्ये एक वृद्ध जोडपं 3 दिवसांपासून पुरात अडकलं, मात्र सीमाप्रश्नात अडकलेल्या या भागात प्रशासनाची वेळेत मदतही मिळू शकली नाही.

बेळगाव सीमाप्रश्नाचा फटका वृद्ध जोडप्याला? 3 दिवसांपासून जीव मुठीत घेऊन घराच्या छतावर
Follow us on

बेळगाव : पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाःकार माजला आहे. कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाचे मदतकार्य देखील अपुरं असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेत भेटेल तो आसरा घ्यावा लागत आहे. अशातच बेळगाव सीमाप्रश्न मदतकार्य करताना परिणाम करत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगाव तालुक्यातील कडपूर गावामध्ये एक वृद्ध जोडपं 3 दिवसांपासून पुरात अडकलं, मात्र सीमाप्रश्नात अडकलेल्या या भागात प्रशासनाची वेळेत मदतही मिळू शकली नाही.

कडपूर येथील कडप्पा-रत्नाव्वा मंडेवर नावाच्या या दाम्पत्याने पुरापासून बचाव करण्यासाठी आपल्या घराच्या छतावर चढत तेथे आधार घेतला. बेळगाव शहरातील बेल्लारी नाला दर मिनिटाला वाढत होता. त्यामुळे अखेर त्यांच्या घराची भिंतही कोसळली. तब्बल 3 दिवसांपासून हे दाम्पत्य अत्यंत कठीण परिस्थितीत आपला जीव मुठीत घेऊन स्वतःचा पुरापासून बचाव करत होते.
दुर्दैवी वृद्ध दाम्पत्याबाबत माध्यमांनी प्रशासनाला सतर्क देखील केले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून त्यांना वेळेत मदत मिळालीच नाही. सीमारेषेच्या वादात अडकलेल्या या भागावर कर्नाटक नेहमीच आपला अधिकार सांगत आलं आहे. मात्र, आपतकालीन स्थितीत नागरिकांना वाचवताना मात्र जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभारच दिसून आला. त्यामुळे राज्यकर्त्यांना केवळ जमीनीवरील अधिकार हवा असून तेथील नागरिकांच्या जीवाची कुणालाही परवा नसल्याचे मत संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.

अखेर 3 दिवसांनी गुरुवारी (8 ऑगस्ट) वयोवृद्ध दाम्पत्याला एनडीआरएफच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भेटीमुळे तरी किमान येथील नागरिकांच्या हेळसांडीत काही फरक पडेल, असा आशावादही स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.