हरियाणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरले, दिवाळीनंतर शपथविधी

| Updated on: Oct 26, 2019 | 9:11 PM

भारतीय जनता पक्ष (भाजप) हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Hariyana Assembly Election) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरले, दिवाळीनंतर शपथविधी
Follow us on

चंदीगड: भारतीय जनता पक्ष (भाजप) हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Hariyana Assembly Election) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, असं असतानाही निकाल त्रिशंकु लागल्याने भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्यानं काही काळ कोण सरकार स्थापन (BJP Forming Government in Hariyana)  करणार याविषयी चर्चेला उधाण आले होते. मात्र, अखेर भाजपने जननायक जनता पक्षाशी (जजप) युती करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप आणि जजपमधील महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावावरही सहमती झाली आहे.

भाजप हरियाणात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करत आहे. याविषयी बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले, “जननायक जनता पक्षाचे नेता दुष्यंत चौटाला हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील.” यानंतर मनोहरलाल खट्टर हरियाणाचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे आमदार अनिल विज यांनी खट्टर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपच्या इतर 38 आमदारांनी या प्रस्तावाला एकमताने संमत केले.

हरियाणाच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मनोहर लाल खट्टर म्हणाले, “जेजेपीच्या 10 आणि अन्य 7 अपक्ष आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. या पाठिंब्यावर आम्ही सरकार स्थापन करत आहोत. सरकारला भाजपचे 40, जेजेपीचे 10 आणि अपक्ष 7 अशा एकूण 57 आमदारांचा पाठिंबा असेल.” यावेळी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले अपक्ष आमदार गोपाल कांडा यांचा पाठिंबा घेणार नसल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, भाजपच्या एक महिला नेत्या आमदार गोपाळ कांडा यांच्यासोबत चार्टर प्लेनमध्ये दिसल्याने भाजप आणि कांडा यांच्या जवळीबद्दल राजकीय वर्तुळात बरिच चर्चा आहे.

खट्टर सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शपथविधी कार्यक्रम रविवारी (27 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता होण्याची शक्यता आहे. खट्टर यांनी आज सकाळी चंडीगड येथे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि भाजपचे महासचिव अरुण सिंह यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. खट्टर सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्रीपद असेल असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.