बापाच्या घरातून देताय का?, फूड पाकिटावरील भाजप नेत्यांच्या फोटोवर राजू शेट्टींचा संताप

| Updated on: Aug 10, 2019 | 1:25 PM

शासनाकडून प्रत्येक पूरग्रस्तांना दहा किलो धान्य वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

बापाच्या घरातून देताय का?, फूड पाकिटावरील भाजप नेत्यांच्या फोटोवर राजू शेट्टींचा संताप
Follow us on

कोल्हापूर : राज्य सरकार पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळतंय की काय असा प्रश्न आहे. कारण पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत.

शासनाकडून प्रत्येक पूरग्रस्तांना दहा किलो धान्य वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मदतकार्य सुरु झालं आहे. पण भाजपकडून मदतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

इचलकरंजी शहरांमध्ये पुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पूरग्रस्तांमध्ये संताप आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे धान्य वाटप करण्यात येणार आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव, आमदार तहसीलदार प्रांताधिकारी यांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे शहरांमध्ये संतापाची लाट आहे.

बापाच्या घरातून देताय का? – राजू शेट्टी

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

“सरकार जी मदत करतंय ते काही उपकार करत नाही. जी मदत देताय ती तुमच्या बापाच्या घरातून देताय का? या पाकिटांवर फोटो लावत आहेत, आता कमळ तेवढं लावायचं राहिलं आहे. पूरग्रस्तांना मदत द्यायची असेल तर स्वत:च्या खिशातली त्या आणि त्यावर तुमचे फोटो चिटकवा. पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळू नका”, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही भाजप केवळ चमकोगिरी करत असल्याचा आरोप केला. “काल गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओ असा किंवा स्टिकर चिटकवणे असो, भाजपच्या नेत्यांची असंवेदनशीलता दिसून येते. भाजप केवळ राजकारण करत आहे”, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

कोल्हापूर-सांगलीत भीषण महापूर

महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली (Maharashtra Flood) शहरात पावसाची रिपरिप सुरुच आहे पण प्रमाण काहीसं कमी आहे. मात्र अजूनही अनेकजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे बचावकार्यही वेगाने सुरु आहे. सकाळी 8 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 52.2 इंच इतकी आहे. तर सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 56 फूट 8 इंचांवर आहे.

पंचगंगेची धोका पातळी 43 फूट आहे, त्यामुळे अजूनही पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षा जवळपास 10 फुटावरुन वाहत आहे. तर कृष्णा नदीची धोका पातळी 45 फूट असून ती सुद्धा 10 फुटांपेक्षा जास्त उंचीवरुन वाहत आहे.

संबंधित बातम्या 

Maharashtra Flood | पंचगंगा 52 तर कृष्णा 56 फुटांवर, महापुराने कोल्हापूर-सांगलीचे मेगाहाल सुरुच