भटक्यांच्या पंढरीतील मढी यात्रेवर कोरोनाचा प्रभाव, भक्तांच्या संख्येत मोठी घट

| Updated on: Mar 14, 2020 | 9:07 AM

भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेवरही कोरोनाचा प्रभाव दिसला आहे (Corona Effect on Kanifnath Madhi Yatra).

भटक्यांच्या पंढरीतील मढी यात्रेवर कोरोनाचा प्रभाव, भक्तांच्या संख्येत मोठी घट
Follow us on

अहमदनगर : भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेवरही कोरोनाचा प्रभाव दिसला आहे (Corona Effect on Kanifnath Madhi Yatra). होळीपासून त्यापुढील पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या मढीतील कानिफनाथाच्या यात्रेला राज्यातील आणि देशभरातील लाखो भाविक हजेरी लावतात. या यात्रेत वैशिष्ट्यपूर्ण गाढवांचा बाजारही भरवला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रभाव यात्रेतील भाविकांच्या संख्येवर झाला आहे. कोरोनामुळे राज्यातील अनेक यात्रा उत्सव रद्द झाले आहेत, मात्र मढी येथील यात्रा सुरु झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे नाथ पंथातील कानिफनाथांची समाधी आहे. या ठिकाणी होळी ते गुडी पाड्व्यादरम्यान 15 दिवसांची मोठी यात्रा भरते. यासाठी राज्यातील भटक्या समाजाचे लोक यात्रेनिमित्त येतात. विशेषतः गोपाल, वैदू, कैकाडी कोल्हाटी, कुंभार या समाजातील मंडळी यात्रेसाठी दूरवरुन येतात. यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे यात्रा होते, की नाही असा प्रश्न होता. मात्र, आयोजकांनी यात्रा रद्द न करता भरवली आहे. रंगपंचमीच्या दिवशी कनिफनाथांच्या समाधी दिन असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी असते. मात्र सर्वत्र कोरोनाचा प्रभाव असल्याने यंदा गर्दी कमी दिसलीये. देवस्थानकडून देखील कोरोनाबाबत ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. मढीतील कानिफनाथ गडाचे कार्याध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी याविषयी माहिती दिली.

या ठिकांणी वेगवेगळ्या प्रकाचे भाविक देखील पाहायला मिळतात. काही तरुण मंडळे वाजत गाजत कानिफनाथाला येतात, तर काही भाविकांकडे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे असलेला बांबू पाहायला मिळतो. त्या बांबूला देवाची काठी म्हणतात. ही काठी मंदिराच्या कळसाला लावण्याची प्रथा आहे. वर्षानुवर्षे या यात्रेला हजेरी लावणाऱ्या भाविकांनी कोरोनाची परवा न करता यात्रेला हजेरी लावली. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा गर्दीत मोठी घट झाली. अनेक भक्तांनी कोरोनाच्या भीतीने यात्रेला येणे टाळले.

गावापासून दूर बालाघाटाच्या डोंगर रांगामध्ये असलेल्या कानिफनाथ गडाचं भटक्या जमातींसह परिसरातील भाविकांमध्ये मोठं महत्वं आहे. काळाच्या ओघात भटक्या जमातीतील अनेक परंपरांमध्ये बदल झाला आहे. परंतू आजही याठिकाणी 15 दिवसांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी मोठ्या भक्ती भावाने येतात.

भारतासह जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर नियंत्रण येऊपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, असं असतानाही आयोजित होणाऱ्या या यात्रांबद्दल तज्त्र काळजी व्यक्त करत आहेत.

Corona Effect on Kanifnath Madhi Yatra