CRPF जवानाला खोलीत डांबून मारहाण, बारामती पोलिसांचा प्रताप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

बारामती (पुणे) : एकीकडे पुलवामा येथे सीआरपीएफच्या 40 जवानांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली, तर दुसरीकडे बारामतीत सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांनीच मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती पोलिसांनी मारहाण केली. शिवजयंतीनिमित्त आयोजित […]

CRPF जवानाला खोलीत डांबून मारहाण, बारामती पोलिसांचा प्रताप
Follow us on

बारामती (पुणे) : एकीकडे पुलवामा येथे सीआरपीएफच्या 40 जवानांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली, तर दुसरीकडे बारामतीत सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांनीच मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती पोलिसांनी मारहाण केली.

शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यासाठी सीआरपीएफ जवान अशोक इंगवले बारामती पोलिस ठाण्यात आले होते. इंगवले यांनी दुचाकीवर दोन भावांसह एक लहान मुलगाही बसवला होता. त्यामुळे “दुचाकीवरुन ट्रीपल सीट का आलात?” अशी विचारणा करत अशोक इंगवले या सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण केली. विशेष म्हणजे, इंगवले यांच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली.

10 ते 15 पोलिसांनी बंद खोलीत डांबून मारहाण केली. तसेच, वर्दीवर असताना बेड्या ठोकल्या, असा आरोप सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांनी केला आहे.

या घटनेमुळं बारामती तालुका पोलिस ठाण्यात युवकांनी गर्दी केली आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून वस्तुस्थितीनुसार कारवाई करु असं पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी म्हटलं आहे.

एकीकडे संपूर्ण देश पुलवामा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांना आदरांजली वाहत आहे, तर दुसरीकडे बारामती पोलिस सीआरपीएफ जवानाला मारहाण करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे बारामती पोलिसांवर ते काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांशी बोलणार : अजित पवार

“पोलिसांना जवानांना मारण्याचे अधिकार दिलेत का? दोषींना योग्य धडा मिळाला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नाही. अवैध धंदे चालतात, त्यावर कारवाई करावी ना. चुकीच्या प्रवृत्तीवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. नको तिथे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी?”, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच, “पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून, शरमेने मान खाली घालायला लावणारं कृत्य आहे.” अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.